बाईक आणि पुणे - दक्षिण भारत - पुणे - भाग २

      
 
<< भाग १

              हळू हळू अंधार पडला. आकाशात पसरलेल्या तांबड्या रंगाच्या छटा नाहीशा होई पर्यंत तिथेच रेंगाळत राहिलो. अंधारबुडुक झाल्यावर रूम वर आलो जेवलो आणि झोपलो

               सकाळी लवकर उठून रूम सोडली आणि जाता जाता मंगलोर मधेच कद्री टेम्पल बघायचं ठरवलं. ते प्राचीन देऊळ पाहून पुढे निघालो कासरगोडला अभिजितच्या मित्राकडे,  'उमेर' कडे. कासरगोड मध्ये पोहोचल्यावर त्याच्या घरी गेलो. जुने परिचयाचे लोक भेटल्यावर अभ्याच्या आठवणी ताज्या झाल्या आणि गप्पा रंगू लागल्या. एका बाजूला मी, अभ्याला दर १५ मिनिटाला निघण्याची आठवण करून देत होतो आणि दुसऱ्या बाजूला उमेर अभ्याला राहण्याचा गळ घालत होता. पण तो मासा काय फसला नाही आणि अखेर दोन तास त्याच्या कडे घालवून, जेवण करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आदल्या दिवशीचा रस्त्याने दिलेला त्रास पुढे नसेल असा वाटत असतानाच परत तेच नाटक सुरु झालं. 'या अल्लाह कूच तो रेहेम कर' (हा 'उमेर' च्या घरात वेळ घालवण्याचा परिणाम) असं म्हणत आमचा प्रवास परत हळू हळू सुरु झाला. कासारगोड सोडल्यावर काही वेळातच आमचा १००० किमीचा टप्पा पूर्ण झाला. मस्त सेलिब्रेट केलं आणि निघालो. अता जायचं होतं कप्पड बीचला. वास्को-द-गामा ने जिथे पाहिलं पाऊल ठेवलं ते ठिकाण. बराच वेळ झाला तरी कप्पड काही दिसायला तयार नव्हत. एका ठिकाणी विचारलं तेव्हा कळालं कि कप्पड मागे राहिलं आणि आपण खूप पुढे आलो आहोत. लगेच U टर्न मारला आणि कप्पडचा रस्ता धरला. अखेर बीच घावलच.

           बीच खूपच सुंदर आहे. बीच वर ठीक ठिकाणी समुद्राच्या थोडं आत पर्यंत दगडी रस्ता केलेला आहे. एक रस्ता पकडून आम्ही पण पार टोका पर्यंत गेलो. एक तास भर घालवला, दोन चार फोटो काढले आणि तिथून चांगल्या आठवणी घेऊन निघालो. खड्डेमय रस्त्याने आमची पाठ काय सोडली नव्हती, तो तसाच अखंड दिसत होता. कधी एकदा कोझीकोड येतंय असं झालं होतं, बसून बसून जाम वाट लागली होती. शेवटी एकदा कोझीकोड आलं पण तिथल्या बीच वर राहायला जागाच नव्हती आणि अख्खं शहर तिथे काही कारण नसताना का जमलंय याचा पत्ता लागत नव्हता. पुन्हा एकदा शोधाशोध सुरु झाली. बरच फिरल्या नंतर आत शहरामध्ये KTDC च हॉटेल मिळालं. मग काही मागण्या न करता आहे ते पदरात पडून घेतलं. दिवस भर गाडी ढकलून...(हो ढकलूनच म्हणावं लागेल अशीच रस्त्याची स्तिथी होती) कांटाळलेलो होतो, तरी नवीन शहर बघावं म्हणून बाहेर पडलो. सगळी कडे नुसती गर्दीच गर्दी, जाईल तिथे अण्णांनी हैराण केलं. त्या दिवशी तिथे गणपती विसर्जन होतं. गणेशोत्सव महाराष्ट्रा बाहेर एवढ्या लांब पण साजरा होतो हे बघून आनंद झाला. त्यातल्या त्यात तिथल ताली टेम्पल अवडल. शांत, निवांत आणि समयांनी उजळून निघालेलं. कोझीकोड मध्ये आतापर्यंत तेवढंच काय ते आमच्या मनाला भावलेलं ठिकाण. मार्केटचा फेरफटका मारला आणि बीच वर रात्री जायचं ठरवलं. आधी पोटोबा करावा म्हणून हॉटेल शोधताना पुन्हा तारांबळ उडाली. एक हॉटेल धड मिळेना, सगळीकडे निराशाच. कुठून कोझीकोड मध्ये राहायला आलो असं झालं, त्यापेक्षा कप्पड कैक पटीने चांगलं होतं. खूप हिंडल्यावर एक हॉटेल मिळालं, मेनू ठरलेला होताच 'डोसा आणि उत्तप्पा ' या पेक्षा जास्त variety मिळणे अवघडच. गुमान जेवलो आणि बीच वर रात्री १०.०० ला गेलो. तिथे जातो तर तिथे अजून गर्दी आहे तशीच. सगळी कडे धूळ आणि घाण. असं वाटत होतं कोझीकोड मध्ये एकही ठिकाण फिरण्या सारखं नाही म्हणून अख्खी जनता इथेच आली आहे. थोडा वेळ घालवून आम्ही परत हॉटेल वर आलो. दिवसभर झालेल्या दमणूकीमुळे लगेच झोप लागली.
                पाचवा दिवस आम्ही केला होता कोचीच्या नावावर. नेहमी प्रमाणेच सकाळी ६.०० ला starter दाबला आणि कोचीकडे प्रस्थान केलं.  NH17  सोडून जरा वाकडी वाट केली आणि ठरल्या प्रमाणे अथीरापिल्लीचा धब धबा बघण्यास साठी आत शिरलो.  अथीरापिल्लीला जाताना वाटेत जंगल लागलं, दोनीही बाजूला किर्रर झाडी आणि मधून जाणारा छोटासा, वळणावळणाचा, कुठेहि खड्डा नसलेला रस्ता. सुसाट निघालो होतो गाडी वर ७० च्या स्पीड ने, अभ्या फोटो काढत निवांत बसला होता मागे, अन मधेच एक अनपेक्षित धूड समोर आलं. एक मोठं  सांबर आमच्या समोर रस्ता ओलांडत होतं. त्याला बघून कचकन ब्रेक दाबून गाडी थांबवली आणि अभ्याला जमेल तितके फोटो काढायला सांगितले.
फोटो मध्ये दोन झाडाच्या मध्ये डाव्या बाझुला खाली.

   जवळ जवळ १० फुट उडी मारून जंगलामध्ये दिसेनासं झाल. इतक्या पटकन हे सगळं घडलं कि, फक्त एकच फोटो नीट काढता आला. पुढे आमच्या अपेक्षा आणखी वाढल्या. अथीरापिल्लीचा धबधबा येई पर्यंत गाडी हळू चालवली पण साध कुत्र सुद्धा आमच्या नजरेस पडल नाही. असो.. अथीरापिल्लीला पोहोचलो आणि धबधबा पहिला. एवढा मोठा धबधबा या जन्मात कधी पहिला नव्हता. यालाच इंडिअन नायगारा सुद्धा म्हणतात. प्रचंड धारा कोसळत होत्या. तिथे आलेल्या एका अण्णाने आमच्या ज्ञानात भर पडली आणि सांगितलं कि कमल हसनचा हा आवडता स्पॉट आहे. मी मनात म्हणालो असेल....गेला तेल लावत. चांगले दोन तास धब धाब्यापाशी घालवले आणि निघालो कोचीला.  

परत येताना जंगलात आम्हाला धो-धो पाऊस लागला. भूक पण लागली होती म्हणून मग वाटेत एका हॉटेल मध्ये थांबलो. मस्त केरळी जेवण (नुसता भात) जेवलो. जेवण होई पर्यंत पाऊसही थांबला होता. पुढे प्रवास सुरु झाला. रब्बर आणि पामच्या झाडा मधून रस्ता काढत काढत आम्ही चेराई बीचला आलो. बीच एकदम उत्तम. राहवलं नाही आणि आम्ही दोघेही समुद्रात घुसलो. भरपूर भिजलो. उंच लाटा मध्ये गटांगळ्या खात मस्त समुद्रावर धमाल केली. निघाल्या पासून समुद्रात भिजणे हा प्रकार इथेच पहिल्यांदा केला. मनसोक्त भिजल्या मुळे अंगात आलेला क्षीण कुठच्या कुठे पळून गेला. मग तिथून आवरत घेतल आणि कोचीला आलो. कोची शहर अवडल. मस्त एका पॉश एरिया मध्ये हॉटेल बुक केलं आणि फ्रेश होऊन कोची पाहायला बाहेर पडलो. तो पर्यंत रात्र झाली होती. फक्त मरीन ड्राइव बघता आलं. बाकी ठरलेल्या गोष्टी दुसऱ्या दिवशी बघायच्या ठरवून आम्ही परत हॉटेल वर आलो.


Marine drive
Chinese fishing net
   दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आवरून कोची हिंडलो. चायनीज फिशिंग नेट, एक चर्च आणि एक देऊळ बघितलं आणि मुक्काम हलवायचा ठरवलं. पाचवा दिवस काढायचा होता अल्लेपी मध्ये. कोची पासून अल्लेपी जवळ असल्यामुळे उशिरा म्हणजे ११.०० ला कोची मधून निघालो आणि १.०० पर्यंत इच्छित स्थळी पोहोचलो सुद्धा. अल्लेपी मध्ये रूम एकदम झक्कास मिळाली, अगदी समुद्र किनाऱ्याला लागून. लगेच फ्रेश झालो आणि निघालो अल्लेपी बघायला. अभ्याने आधीच एका मित्राला फोन करून बोटीची व्यवस्था करून ठेवली होती. तीन तास बोट मध्ये घालवायचे, न्हवे न्हवे जाणार होते. बोट मध्ये बसून जसजस पुढे जायला लागलो तसतस डामरी रस्ता गायब झाला, होता तो फक्त पाण्याचा रस्ता. अल्लेपीला  venice of east का म्हणतात हे जाणवायला लागलं. छोट्या छोट्या बेटांनी बनलेला अल्लेपी पाहायला गम्मत वाटली. सगळी कडे बेटांवर हिरवीगार पसरलेली भातशेती आणि बेटाच्या कडेला बांधलेली छोटी छोटी घरे. असंख्य प्रकारचे पक्षी आणि त्यांचे आवाज. निसर्गाने भरभरून दिलं आहे अल्लेपीला. अस्सल फोटोग्राफेर्स साठी तर अल्लेपी म्हणजे मेजवानीच.

 
आमचा कॅप्टन आम्हाला प्रवासात वेगवेगळी  माहिती देत होता. ओणम कसा साजरा होतो, बोटच्या शर्यतीत कोणती बोट वापरली जाते, हाउसबोट तर इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या दाखवल्या कि बासच. बोटीतून फिरताना आम्हाला पाण्याचा मोह आवरला नाही आणि आम्ही बिनुला (कॅप्टन) पोहोण्यासाठी विचारलं. पोहायला येत असेल तर बिंदास उडी

 मारा असं सांगितल्यावर आम्हाला थांबवलं नाही. लागलीच बोटीतून उडी टाकली पाण्यात. १०-१५ मिनिटे पोहोलो आणि खूप सुखावह वाटलं. तीन तास कसे गेले कळल नाही आणि आम्ही परत निघालो त्या ठिकाणी पोहोचलो. बिनुला परत येण्याचं वचन देऊन आम्ही रूम वर आलो. रूम वर येऊन मस्त विसावा घेतला. समोरचा समुद्र शांत होता. ढग असल्यामुळे सूर्यास्त बघायला नाही मिळाला पण वातावरण मात्र झक्कास होतं. पूर्ण वेळ विश्रांती घेतली आणि रात्री जेवून झोपलो.
          अता होता सातवा दिवस कन्याकुमारीचा, सकाळीच बिनुला दिलेल वचन पूर्ण करायच असं निश्चय करून अल्लेपी सोडलं आणि कन्याकुमारीच्या मार्गाला लागलो. पाहिलं ठिकाण होतं त्रिवेनद्रम मध्ये पद्मनाभ स्वामीचं देऊळ. १२.०० च्या सुमारास आम्ही देऊळात पोहोचलो आणि कळलं कि १२.३० ला देऊळ ४ तासासाठी बंद होतं. तशीच गाडी लावली आणि मोठी बॅग विष्णूच्या हवाली करून त्याचच दर्शन घेण्यासाठी गेलो.  देऊळा मध्ये फक्त लुंगी घालून प्रवेश आणि फोटो काढण्यास मनाई असल्यामुळे सगळच समान एका ठिकाणी डेपोझीट केलं. लुंगी गुंडाळली आणि आत गेलो. ५००० वर्ष पूर्वीचं देऊळ अजूनही दिमाखात उभं आहे. गाभाऱ्यात विष्णूची भली मोठी मूर्ती झोपलेल्या अवस्थे मध्ये आहे. एकाच नजरेत मूर्तीचं दर्शन मिळत नाही तर तीन वेगळे दरवाजे शेजारी शेजारी आहेत.  जिथून मूर्तीचा एक एक भाग दिसतो. पहिल्या दरवाजातून शेषनाग आणि विष्णूचा मुख दिसत, दुसऱ्या मधून विष्णूच्या बेम्बीतून बाहेर आलेलं कमळ आणि कमळात बसलेले ब्रह्मदेव आणि तिसऱ्या दरवाजातून विष्णूचे चरण दिसतात. आणखी उशीर झाला असता तर हे सौंदर्य पाहण्यापासून वंचित राहिलो असतो, पण विष्णूच्या मनात तसे नव्हते. तिथेच प्रसाद घेतला आणि पुढे निघालो. आता आम्हाला जायचं होतं कोवलम बीचला. कुठेहि जास्त वेळ न घालवता थेट कोवलम बीचला गेलो. दक्षिणेतला आणखी एक सुंदर बीच पण गोव्या सारखी प्रेक्षणीय स्थळे कुठेच दिसत नाहीत [;)] . इथे पण चेराई बीच सारखीच धमाल केली, पुष्कळ खेळलो पाण्यात. बीच तसा धोकादायक आहे. जिथे खोली जास्त आहे अश्या जागोजागी लाल झेंडे गाडून ठेवले आहेत आणि कोस्ट गार्ड सारखं शिट्या वाजवून लोकांना धोक्याच्या पातळीची जाणीव करून देत असतो.
  

कोवलम बीचवर मनाला समाधान होई पर्यंत वेळ घालवल्यावर आम्ही निघालो पूवर बेट बघायला. पूवर बेट जवळ पोहोचलो पण बेटावर जाण्यासाठी वेळ आमच्या कडे नव्हता म्हणून आम्ही लांबूनच ते बघितलं, तिथे समुद्र किनारी थोडा वेळ घालवला. पूवर वरून निघालो,  वर्षभरापूर्वी ज्या ठिकाणी जायचं ठरवलं होतं ते अता हळू हळू जवळ येत चाललं होतं. खेड्यापाड्यातून रस्ते शोधत शोधत पुन्हा हायवे वर यायला आम्हाला बराच वेळ लागला. अखेर आम्ही भारताच्या शेवटच्या टोकाला, कन्याकुमारीला रात्री ७.०० ला पोहोचलो. अगदी समुद्रा किनाऱ्या जवळच रूम घेतली म्हणजे दुसऱ्या दिवशी सूर्योदय बघायला लवकर जाता येईल.
          आठवा दिवस हा विश्रांतीचा दिवस होता. साप्ताहिक सुट्टी मध्ये खंड न पडता आम्ही प्रवासाला सुद्धा एक दिवस सुट्टी दिली होती.  सकाळी लवकर आवरून ५.४५ लाच समुद्रावर गेलो, पाहतो तर तिथे आम्ही जायच्या आधीच, त्या आग ओकणाऱ्या गोळ्याच स्वागत करायला जत्रा भरलेली. बहुतेक लोकं उत्तरे कडील होती. नशीब चांगलं म्हणून एका ठिकाणी कट्ट्यावर जागा मिळाली बसायला. सगळे जण आकाशात होणारी रंगांची उधळण पाहत, क्षितिजा कडे डोळे लावून बसलेले आणि तेवढ्यात तो क्षण, केवळ अप्रतिम म्हणता येईल असा, आलाच. हळू हळू अंधाराला हरवून नेहमी प्रमाणे विजयीरथात बसून सूर्यदेवांच आगमन झालं. तो मनोहारी क्षण टिपण्यात लोकं गुंग होती. जो तो हवे तसे फोटो काढत होता. सूर्याचं दर्शन झाल्यावर एकीकडे मी सूर्याचे फोटो काढत होतो आणि दुसरी कडे लोकांचे ते माकडचाळे बघत होतो. तास भर मस्त टाइम पास झाला. मग घरी आलो (त्यावेळेला रूम म्हणजे घरच होतं) आणि आवरून विवेकानंद स्मारक बघण्यासाठी गेलो. स्मारकावर जायला केरळ सरकारचीच बोट सेवा उपलब्ध आहे. स्वामी विवेकानंदांनी जिथे तीन दिवस ध्यान केलं त्या खडकावरचं ते भव्य स्मारक खूपच छान आहे.



स्वच्छता आणि नीटनेटकेपणा राखला आहे. स्मारकावर गेलं कि त्रिवेणी संगम दिसतो.
  जिथे बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागर एकत्र येतात. पाण्यावर तीन रंगांच्या (बंगाल उपसागर हिरवा, अरबी समुद्र काळपट आणि हिंदी महासागर निळा) वेगवेगळ्या छटा अगदी स्पष्ट पणे दिसतात. स्मारक बघून आम्ही शेजारीच असलेल्या थिरुवल्लुवर संताच्या पुतळ्याला भेट दिली. काळ्या पाषाणाने बनलेला तो  अवाढव्य पुतळा १० वर्षापूर्वी तिथे निर्माण केलेला आहे. त्सुनामी आली तेव्हा कन्याकुमारीला
फटका बसला पण या दोनीही वास्तूंना काहीच झालं नाही, त्या तश्याच ताठ उभ्या आहेत.  असो.....ते बघून होता होता वाजले १२.०० आणि शरीराने उदरभरण करायची इच्छा व्यक्त केली. मग शोध सुरु झाला केरळी जेवणाचा. कन्याकुमारी मध्ये केरळी जेवण मिळायची पंचाईत झाली. जाइल  तिकडे पंजाबी, गुजराती, राजस्थानी जेवण होतं पण केरळी नव्हत आणि आम्हाला त्याशिवाय दुसर काही नको होत. अखेर एका छोट्या ढाब्यावर अगदी हवं तसं केळाच्या पानावर केरळी जेवण मिळालं. आमचे आत्माराम शांत झाले होते आता शरीराला शांत करायचं होतं (आराम, उगाच नसते विचार डोक्यात आणू नका... ) , मग काय पुढे घरी येऊन जे ताणून दिली ते संध्याकाळीच उठलो. दुपारच्या झोपेची मजा काय असते हे फक्त दुपारी झोपणाऱ्यालाच कळते.  संध्याकाळी उठलो आणि सूर्यास्त बघायला गेलो. सनसेट पॉइंटला पोहोचलो आणि दिवसभर आपल्या तेजाने दिपवून टाकणाऱ्या त्या गोलाच्या जाण्याची वाट पहात एका खडकावर बसलो. संथ पणे सूर्य अस्ताला जात होता, बाजूच्या खडकावर एक काका हात जोडून काही तरी मंत्र पुटपुटत होते. जसं जसं सूर्यास्त होयला लागला, लोकांनी वापरलेली एक कल्पना डोक्यात आली. गाडीचे फोटो सूर्यास्ता होताना काढायचे, लगेच गाडी साइडस्टॅंडला लावली आणि उगाच कलाकारी सुरु झाली. लोकं वेड्या सारखे वेडे काय करतात ते बघत होते.
 संधी प्रकाशाचं अंधारात रुपांतर होई पर्यंत तिथेच थांबलो. सूर्याला निरोप देऊन आम्ही परत रूम वर आलो. आता काहीच काम नव्हतं (तसं रोजच नसतं), वेळ घालवायला एका हॉटेल मध्ये जाऊन टीव्हीवर मल्लू च्यानेल बघत बसलो. तिथेच जेवलो आणि रूम वर जाऊन आडवे झालो. विश्रांतीचा दिवस संपला होता.



क्रमशः>>भाग ३

1 comment:

  1. bharich.........ekdam zakas lihile ahes re........kay dhamal keli tumhi he photo tun disatech ..........pan toozya shabdatun evdhe kalate he khare pravas varnan........pudcha bhag tak re lavkar......

    ReplyDelete