धुंदी

पहाटे पहाटे ठसे, चांदण्याचे राहिले,
अप्रतिम ते क्षण, लावण्याचे राहिले

भावना होत्या कैक, हरवलो होतो असा,
एक एक भावना, सांगण्याचे राहिले

स्तब्ध होतेच सारे, नि:शब्द आपण दोघे
शांततेचा तो आवाज, ऐकण्याचे राहिले

उजळल्या दाही दिशा, फुटले ते तांबडे
सौंदर्य ते मनात, कोरण्याचे राहिले

उद्याही त्याच क्षणांची, वाट मी पहातो
निसटता त्या मिठीतून, बोलण्याचे राहिले

                                                               -- मनराव

'लेह' वारी, अंतिम भाग


<< भाग ५


                  सकाळी सगळं आवरून निघायला ९.०० वाजले. ज्यासाठी आलो होतो तो उद्देश पूर्ण झाला होता. अमरीत्सर पहायचा मानस होता पण वेळे अभावी तो रद्द केला. त्यामुळे आता लवकरात लवकर आणि सुखरूप घर घाठायचं होतं. श्रीनगर सोडलं आणि सुरु झाला परतीचा प्रवास. शहर सोडलं आणि पुढे एका पेट्रोल पंपावर थांबून गाडीची पेटपूजा उरकून घेतली. एकदा का तिची मेजवानी झाली कि दिवसभर ती कसलाही ताप देणार नाही याची आता पर्यंतच्या प्रवासात खात्री पटली होती. आज आम्ही पठाणकोटला मुक्काम करायचं ठरवलं होतं. श्रीनगर - पठाणकोट  अंतर आहे साधारण ३५० km. पण मधला उधमपूर-सांबा मार्ग सोडून जम्मू मार्गे गेलं तर ५० km अंतर वाढतं. ५० km जास्त अंतर पडलं तरी चालेल पण रस्ता चांगला असेल म्हणून जम्मू मार्गे जायचं ठरवलं होतं. काय करणार खडकाळ भागातून गाडी चालवण्याचा कंटाळा आला होता. असो... तर आम्हाला एकूण ४०० km अंतर कापायचं होतं ज्यात सर्वात मोठा अडथळा होता या मार्गावर असलेला २५० km चा घाट, जो सतत वाहता असतो. श्रीनगरला जम्मूशी आणि इतर अख्या देशाशी जोडणारी लाईफ लाईनच म्हणा ना. आम्ही श्रीनगर सोडून ५०-६० km आलो असू आणि तोच सुरु झाला वळणा वळणाचा प्रवास. हळू हळू वर जात असताना दिसलं कि थोड्या थोड्या अंतराने CRPF चे जवान पहारा देत होते. दर १०० - २०० मीटर नंतर एखादा तरी जवान दिसत होताच. यावरून हा घाट किती महत्वाचा असेल याची कल्पना येते. आम्ही थोडे वर पोहोचलो तेव्हा मागे वळून पहिलं तर बोर्ड दिसला "First view of Kashmir valley". पण आमच्यासाठी तो "Last view of Kashmir valley" ठरला होता. लगेच तुषारला थांबण्यासाठी खुणावलं आणि गाड्या बाजूला घेतल्या. डोळेभरून ते दृश्य पाहिलं. मधे मधे त्या पॉईंटवर असलेला, तिथला टोप्यांचा व्यापारी आम्हाला काश्मिरी टोपी विकत घेण्यासाठी खूप त्रास देत होता. पण आम्हाला काय तो टोपी घालू शकला नाही. त्याच्या बोलण्याकडे सपशेल दुर्लक्ष करत आम्ही "The Kashmir valley"च डोळेभरून दर्शन घेतलं आणि तिथून निघालो.


                जसे जसे पुढे गेलो तसा आम्हाला समोर दिसला जवाहर टनल. शेजारी शेजारी, कमी रुंदी असलेले, साधारण २ ते २.५ km लांब असलेले दोन भोगदे. रुंदी इतकी कमी कि भोग्द्यात कोणत्याही गाडीला ओवरटेक करता येत नाही. ते अंधारी भोगदे ओलांडले आणि खऱ्या अर्थाने आम्ही काश्मीरला मागे टाकले. अजून खूप अंतर जायचं होतं. वळणा वळणाच्या रस्त्यावर कुठेही दुभाजक नाही. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा (जास्त करून ट्रकांचा) अंदाज घेत एक एक गाडी ओलांडून पुढे जात होतो. एका नंतर एक डोंगर चढून उतरत होतो. हा खेळ दुपारी १.३० पर्यंत चालला होता. सकाळी निघाल्या पासून काही खाल्लं नव्हतं, शिवाय काश्मीरच दर्शन घेतल्या नंतर कुठेही थांबलो नव्हतो. अखंड २-२.५ तास गाडी चालवून झाल्यावर शरीर थांब थांब म्हणून ओरडायला लागलं म्हणून मग एक चांगला ढाबा बघितला आणि थांबलो. सणकून भूक लागली होती. मसुराची उसळ, भरपूर लोणी लावलेली रोटी, भात आणि डाळ. जोडीला कांदा आणि लोणचं. वाह!!! मस्त मेनू होता,  पोटभर जेवलो. जेवण झाल्यावर तिथेच झोपावं अशी इच्छा झाली पण आमच्या मेंदूने ती कृतीत उतरू दिली नाही. अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा होता. घरी फोन करून हालहवाल कळवला गेला. साधारण तासभर तिथे थांबलो आणि पुन्हा प्रवास सुरु झाला. लेह मधल्या नुसत्याच मातीच्या आणि खडकाळ, भकास डोंगरांची जागा आता हिरवाईने नटलेल्या, जीवनाने ओथंबून वाहणाऱ्या डोंगरांनी घेतली होती. दरीत वाहणारी ती सरिता मात्र अजून बरोबर होती. तिच्या साथीने प्रवास करता करता एकदम ती गायब झाली.


आम्ही डोंगर माथ्यावर पुन्हा चढायला लागलो. बघता बघता पटनी टॉप आला (हिल स्टेशन) आणि मागे गेला. २ तास प्रवास केल्यावर एके ठिकाणी चहासाठी थांबलो. न थांबता, गाडी डोंगर दऱ्यातून पिळत होतो. त्यामुळे ती चांगलीच गरम झाली होती. १० - १५ मिनिटे थांबून ती शांत झाल्यावर तिथून निघालो. साधारण ४-४.३० वाजले तेव्हा आम्ही उधमपूर जवळ पोहोचलो. जम्मू अजून दृष्टीपथात पण नव्हतं. पठाणकोटचा मुक्काम हुकणार यावर शिक्कामोर्तब झालं. तरी जम्मू ओलांडून पुढे जमेल तिथ पर्यंत जाऊ असं ठरवलं. हळू हळू घाट रस्ता कमी होऊ लागला आणि आम्ही पठारावर यायला लागलो. परत तासा भाराने एके ठिकाणी चहाब्रेकसाठी थांबलो आणि जम्मूच्या बायपासची चौकशी केली. शिवाय राहण्यासाठी कुठे व्यवस्था होईल याची हि माहिती घेतली. ज्या ट्राफिक इंस्पेक्टरला विचारलं त्याने जम्मू पासून १७ मैलावर, "१७ miles" असं हॉटेल आहे त्याची माहिती दिली. तडक आम्ही त्या दिशेने निघालो. थोड्याच वेळात जम्मू बायपासला पोहोचलो. जम्मू ओलांडताना सूर्यदेव आपलं दिवसाचं काम आटोपतं घेऊ लागले होते. अंधार पडायला सुरुवात झाली होती. आम्हाला शोधायचं होतं "१७ miles". जम्मू पासून रस्ता एकदमच चकाचक होता. सुसाट निघालो आणि हॉटेल जवळ पोहोचलो. त्या हॉटेलचं बाहेरील रूप पाहूनच तुषार म्हणाला, "हे आपल्या कामाचं हॉटेल नाही". "बघू, चौकशी तर करू, हे नाही तर दुसरं", असं म्हणत मी गाडी लावली आणि आत गेलो. हॉटेल मधल्या सुंदरीने खोट्या हास्यवदनाने स्वागत केलं आणि माहिती द्यायला सुरुवात केली. तिचं पाहिलं वाक्य होतं. "एका खोलीच कमीत कमी भाडं ४५०० रुपडे फक्त" (फक्त, हे विशेषण फक्त हॉटेल मालकांसाठी आणि त्या मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी असतं). बास हे ऐकल्यावर माझ्या  कानातले अदृश्य फिल्टर चालू झाले आणि पुढची तिची सगळी वाक्य गाळू लागले. त्यामुळे पुढे ती काय बोलली यातला एकही शब्द मला आठवत नाही. ती काही तरी बोलत होती एवढच काय ते आठवते. मी पण तिच्या सारखच तितक्याच हास्यवदनाने, ती जे काही बोलते आहे ते ऐकतो आहे, असा आव आणत होतो. डोक्यात वेगळेच विचार चालू होते. "च्यायला!!!, आम्ही १५०० ला सुद्धा टांग देतो आणि ४५०० तुझ्या डोम्बल्यावर कधी मारणार???", वगैरे वगैरे. ५ मिनिटांनी ती गप्प बसली आणि मी बाहेर पडलो. तुषार बाहेरच थांबला होता. त्याला जे झालं ते सांगितलं आणि आम्ही तिथून निघालो. अंधार पडला होता आणि आम्हाला लवकरात लवकर रूम शोधायची होती. रस्त्यावर चौफेर नजर फिरत होती. एके ठिकाणी आश्रमाची पाटी दिसली. पण रोड पासून २ km आत होतं म्हणून तुषार नको म्हणाला. असेच पुढे जात राहिलो पण हॉटेल काही मिळेना म्हणून मग सांबा पर्यंत जाऊ असे ठरले. सांबा आल्यावर हायवेलाच एक हॉटेल दिसलं. बाहेरून आणि आतून बरं वाटलं आणि मुख्य म्हणजे बजेट मध्ये होतं. ६०० रुपयात रूम मिळाली आणि आम्ही लगेचच आमच्या प्रायवेट विधानसभे मधे हॉटेलच बिल पास केलं. सगळं समान वर नेऊन टाकलं. फ्रेश झालो आणि जेवण्यासाठी बाहेर पडलो. मालकाने सांगितलेल्या जवळच्याच एका ढाब्यावर गेलो. जेवलो आणि रूम वर आलो. चार पाच दिवसांचा हिशोब राहिला होता तो केला आणि दिलं अंग झोकून. दिवसभर अखंड प्रवास करून क्षीण आला होता. बेडवर पडल्या पडल्या निद्रादेवीच्या आधीन झालो.
                    सकाळी लवकर उठलो आणि ७.०० - ७.३० लाच हॉटेल सोडलं.  आज चंडीगडला लवकर पोहोचून गाडी सर्विसिंग करून घ्यायची होती. सांबा पासून चंडीगड होतं ३०० km आणि सगळा चकचकीत टार रोड. रस्त्याच्या दुतर्फा हिरीविगार पसरलेली शेती. काय मस्त वाटत होतं गाडी चालवताना. हवेतला गारवा मी म्हणत होता आणि आम्ही सुसाट पुढे निघालो होतो. मनात म्हणालो "हा आजू बाजूचा टवटवीत परिसर पुन्हा बघायला मिळणार नाही", तसे लगेच होतो तिथे तुषारला थांबायला सांगितलं. १०-१५ मिनिटे उगीचच थांबलो आणि मग पुढे निघालो. साधारण १० वाजता जेव्हा पोटात कावळे ओरडायला लागले तेव्हा नजर रस्त्यावर कमी आणि आजूबाजूच्या ठेल्यांवर जास्त जाऊ लागली. अचानक समोर MacD चा बोर्ड दिसला आणि गाड्या आपोआपच त्या दिशेने वळवल्या. खूप दिवसांनंतर MacDत जाऊन बर्गर खायला मिळणार होता. इतर MacD प्रमाणेच हे हि होतं, काहीही नाविन्य नाही. पंजाबात काय आणि पुण्यात काय, इथून तिथून सगळे MacD सारखेच. मस्त दोन दोन बर्गर हाणले आणि निघालो. पंजाबच्या रस्त्यावरून जोरात गाडी चालवत होतो. या वेळीहि आम्ही, एकही गाडी पुढे जाऊ दिली नाही. एक एक गाव मागे टाकत पुढे जात असताना एका पट्यात रस्त्याच्या दोनीही बाजूला संत्र्यामोसम्बाच्या बागा लागल्या. आपसूकच गाडीचे ब्रेक लागले गेले आणि एका बागे बाहेर असलेल्या रसवंतीगाडी जवळ आमची गाडी थांबली. दोन दोन ग्लास ताजा मोसंबी रस पिउन झाला आणि मग आम्ही निघालो.






आम्ही निघालो ते थेट चंडीगड मधेच थांबलो. साधारण दुपारी १ ला आम्ही चंडीगडला पोहोचलो. ३०० km अंतर तीन वेळा थांबून ६ तासात कापलं. तिथे पोहोचलो आणि गाडी थेट सर्विस सेंटरला घेऊन गेलो. या वेळी शोधाशोध करायची भानगड नव्हती. गाड्या सर्विसिंगसाठी सोपवल्या आणि कृष्णाला, आम्ही पुन्हा छळायला आल्याची वर्दी दिली. गाडीचं काम होई पर्यंत ३-४ तास जाणार होते म्हणून मग तिथून बाहेर पडलो. दोन बर्गर वर तग धरण्याची ताकत नसलेले पोट पुन्हा भरण्यासाठी हॉटेल शोधू लागलो. पण त्या सेक्टर मध्ये एकही हॉटेल मिळेना. जिथे तिथे गाडीची सवय असलेले पाय किती वेळ चालणार हो!!! थोडे भटकून झाल्यावर शेवटी एके ठिकाणी रस्त्यावरच छोले-भटुरे विकणारा एक ठेला दिसला. तुषारला भूक नव्हती पण मला काही राहवेना. तिथेच फुटपाथ वर बसलो आणि ऑर्डर दिली. एका नंतर एक गरम गरम भटुरे पानात पडू लागले. छोले संपले कि तो कप्पा पण लगेच भरत होता. मस्त गरम गरम ७-८ भटुरे हाणले तेव्हा कुठे पोटोबा शांत झाले. शेजारीच असलेल्या ड्रम मधून पाणी घेतलं. थोडं हात धुवायला वापरलं आणि उरलेलं पिउन टाकलं. अहाहा !!! किती बरं वाटलं तेव्हा.. सुख सुख म्हणतात ते असं असतं. तिथून निघालो, ATM शोधलं, पैसे काढले आणि सर्विस सेंटरला स्वारी पुन्हा हजर झाली. एव्हाना ५ वाजले होते. आमची घोडी खरारा करून स्वच्छ अंघोळ घालून तयार झाली होती. आपली गाडी चकचकीत बघितली कि खूप छान वाटतं. तिथला सगळा हिशोब मिटवला आणि कृष्णाच्या घरी गेलो. परत आल्याचं पाहून त्याला खूप आनंद झाला. शिवाय एक दिवस त्याच्याकडे मुक्काम करण्याचं वचन आम्ही पूर्ण करणार म्हणून गडी आणखी खूष होता. निवांत गप्पा मारत संध्याकाळ गेली. हॉटेल मध्ये जाऊन 'बसण्यापेक्षा' घरीच 'बसायचं' ठरलं. मग घरी बसण्यापेक्षा घरा सारखीच त्याच्या एका मित्राची रूम होती. तिकडे मुक्काम करायचं ठरलं. उगाच त्याच्या घरच्यांना कशाला त्रास. त्या प्रमाणे सगळं जेवण रूमवर मागवून आरामात जेवण केलं. रात्री ३ - ४ वाजता कधी तरी झोप लागली.
                  आता एवढ्या उशिरा झोपल्यावर सकाळी कोणी लवकर उठतं का?  आरामात १० ला उठलो. सगळं आवरून कृष्णाकडे जायला १२.०० वाजले. थोडा वेळ गप्पा मारल्या आणि वहिनीच्या हातचं मस्त जेवण करून आम्ही चौघे बाहेर पडलो. दोनीही बुलेटला सुट्टी देऊन त्यांच्या गाड्यांना थोडी तसदी दिली. चंडीगड मधे फेरफटका मारला. संध्याकाळी चंडीगड मधील एक दोन ठिकाणं बघायचं ठरवून, दुपारी मित्राच्या रूम वर आलो. पण नियतीने काही वेगळंच ठरवलेलं होतं. गेल्या १०-१२ दिवसात ज्याची आम्हाला आठवण सुद्धा आली नव्हती, त्याने त्याचं अस्तित्व दाखवायचं ठरवलं आणि त्या प्रमाणे दुपारी ३.०० नंतर अंधारून यायला सुरुवात झाली. थोड्याच वेळात तो मोठ मोठे टपोरे थेंब घेऊन कोसळायला लागला. चांगले २ - ३ तास त्याचा थयथयाट चालू होता. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट एवढेच काय ते आवाज ऐकू येत होते. फेरफटका तर लांबच राहिला पण घरा पासून ५ फुट बाहेर सुद्धा पडता आलं नाही. पूर्ण संध्याकाळ घरी बसून घालवावी लागली. अखेर तो उघडल्यावर पोटापाण्याच्या व्यवस्थेसाठी आम्ही बाहेर पडलो. जेवण करून घरी आलो आणि झोपलो. चंडीगड फिरायचं राहून गेलं.
              वारीच्या परतीचा प्रवास अंतिम टप्यात आला होता. चार - पाच दिवसात घरी जाऊ असं लेह मधे असतानाच ठरवलं होतं. त्या प्रमाणे एक दिवस गेला होता आणि आणखी चार दिवस उरले होते.  आज जयपूर पर्यंत जायचा बेत होता. त्या प्रमाणे सकाळी लवकर उठून आवरलं आणि ७ - ७.३० लाच आम्ही बाहेर पडलो. चंडीगडच्या वेशी पर्यंत कृष्णा सोडायला आला होता. तिथून पुढे तो कामाला गेला आणि आम्ही राजधानीकडे कूच केले. १५ दिवस आधीचा पावसाळी अनुभव लक्षात घेता हरयाणाच्या गावा-गावातून वाट काढत, खड्यांचे धक्के खात जाण्यापेक्षा दिल्ली मार्गे जायचा निर्णय घेतला होता. पानीपत पर्यंत रोड ओळखीचा होता त्यामुळे सुसाट निघालो होतो. पुन्हा ८०-९०-१०० ने गाडी हाकायला सुरुवात झाली. दोन काळ्या बुलेट दिसेल त्या गाडीला मागे टाकत पुढे मार्गक्रमण करत होत्या. आदल्या दिवशी धो-धो पडलेल्या पावसाने आज मात्र उघडीप घेतली होती त्यामुळे हायसं वाटत होतं. पानिपत ओलांडून पुढे आलो आणि नवीन परिसर चालू झाला. पाण्याने भरलेले ढग नाहीसे झाले पण पावसाळा चालू असल्यामुळे चहूकडे हिरवळ दिसत होती. अशा वातावरणात प्रसन्न मनाने सलग २-३ तास गाडी चालवल्या नंतर पोटोबा गप्प कसे बसतील. मग त्यांना शांत करण्यासाठी एका ढाब्यावर थांबलो. भरपेट नाष्टा केला. दुपारी २-३ वाजे पर्यंत तरी काही लागणार नाही एवढं खाल्ल्यावर तिथून लगेच निघालो. पुन्हा तोच अखंड प्रवास चालू झाला. कुठेहि कुणासाठी थांबण्याचा प्रश्नच नव्हता. काम फक्त एकच, "सपाट रस्त्यावर सुसाट गाडी चालवणे". बघता बघता दिल्ली आली आणि तिने आमचं स्वागत केलं.


                 दिल्लीत पोहोचल्यावर रस्ता शोधणे सुरु झाले. दर दोन चौकात विचारपूस करून करून शेवटी एकदाचा NH८ सापडला आणि जीव भांड्यात पडला. चंडीगड पासून दिल्ली पर्यंत टोल रोड होता त्यामुळे रस्ता चकाचक आहे. तीच तऱ्हा NH ८ ची. पुन्हा वेगाने आमचं डोकं काबीज केलं आणि आम्ही वाऱ्या बरोबर उडू लागलो. सकाळी ७ ला निघाल्यावर १० ला नाष्ट्याला थांबलो होतो. तिथून ११ ला निघालो आणि दिल्ली ओलांडून पुढे कुठेही न थांबता दुपारी ३ वाजे पर्यंत गाडी चालवली. कुठेतरी जेवयचचं आहे म्हणून मग एक चांगलं हॉटेल बघितलं आणि थांबलो. चांगला तास भर आराम केला आणि पुन्हा प्रवास सुरु झाला. ठरल्या प्रमाणे जयपूरला पोहोचणारच होतो. संध्याकाळचे ५ - ५.३० वाजले असतील तेव्हा आम्ही जयपूर जवळ पोहोचलो. जयपूर मध्ये प्रवेश केला आहे असं वाटत असतानाच रस्त्यावरचे दगड वेगळीच कथा सांगू लागले.

इतका वेळ दर चार दोन किमी ने आम्हाला सगळ्या दगडांवर NH८ लिहिलेलं दिसत होतं ते अचानक NH ११ दिसू लागलं. ४-५ किमी पुढे गेल्यावर माझी ट्यूब पेटली. जोरात गाडी चालवण्याच्या नादात कधी NH८ सुटला आणि NH ११ लागला कळलंच नाही. मी तुषारला रस्ता चुकलो आहोत हे खुणावलं. लगेच थांबलो आणि किशनगड रस्त्याची चौकशी सुरु झाली. रस्ता विचारण्यासाठी १०० वेळा थांबून, गल्ली बोळातून मार्ग काढण्यात बराच वेळ गेला. ते अख्खं गुलाबी शहर ओलांडताना ६.०० वाजून गेले. पुन्हा जेव्हा  NH ८ असलेला दगड दिसला तेव्हा बरं वाटलं. अंधार पडायला सुरुवात झाली होती. किशनगड आणखी १०० km होता. आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि दोघांच्या डोक्यात एकच विचार आला. "किशनगडला जायचं का ?" ( याला म्हणतात टेलीपथी). दोघांचेहि डोळे चकाकले आणि गाड्या किशनगडकडे धावू लागल्या. किशनगडला पोहोचायला आणखी किमान सव्वा ते दीड तास लागणार होता. पण त्यात दोन फायदे होते. एक म्हणजे दुसऱ्या दिवशी १०० km कमी गाडी चालवायची आणि दुसरं म्हणजे हॉटेल शोधायची भानगड नाही, 'लेह'ला जाताना ज्या हॉटेल मध्ये थांबलो होतो त्याच हॉटेल मध्ये पुन्हा थांबायचं होतं. सूर्य मावळला होता पण गाडी चालवायचा उत्साह मात्र मावळला नव्हता. रात्रीच्या अंधारात आजूबाजूला नुसतेच ट्रक धावत असताना दोन बुलेट त्यांच्या मधून सरशी साधून पुढे झेपावत होत्या. कधी त्याला वाट दिसण्यासाठी किंवा वाहन ओलांडण्यासाठी मी लाईट दाखवून मदत करायचो, कधी तो मला मदत करायचा. सुमारे तासभर हा खेळ चालू राहिला आणि मग आम्ही दिवसाअखेर साधारण ६२५ km गाडी चालवून हॉटेलला पोहोचलो. रूम बुक केली. या वेळी रूम मधे कुठेही किडे नव्हते. ते बघून झोप शांत लागणार याची शाश्वती मिळाली. मस्त पंजाबी जेवण घेतलं, रूमवर येउन हिशोब केला आणि झोपलो.
                 सकाळी लवकर उठलो आणि आदल्या दिवशी सारखच  ७.०० - ७.३० ला निघालो. आजचा मुक्काम होता हलोलला. जिथे आम्ही 'लेह'ला जाताना राहिलो होतो ते गाव. आधीच्या त्याच "हॉटेल राजधानी" मध्ये रहायचं ठरवलं होतं. एवढी भूक नव्हती म्हणून नाष्टा न करताच निघालो. रोड माहितीचाच होता. रमत गमत जाण्यात मला काही तथ्य वाटलं नाही आणि त्यालाही तसा फारसा इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे आपसूकच इकडे तिकडे न बघता दोघेही जोरात निघालो होतो. मनमुराद गाडी चालवण्याचा आनंद आम्ही दोघेही लुटत होतो. आत्ता पर्यंतच्या प्रवासात दोघांपैकी एकालाही गाडी चालवण्याचा कंटाळा आला नव्हता. अर्थात काही वेळा आला पण तो तात्पुरता त्या ५-१० मिनिटांपूरताच. पुन्हा तो धूम पळून जायचा आणि आम्ही गाडी पुढे रेटायला मोकळे असायचो. सलग ३-४ तास गाडी चालवल्यावर आम्ही एका ढाब्यावर विश्रांतीसाठी थांबलो. वारीला निघताना इतरांनी आणि घरच्यांनी भरपूर सूचना दिल्या होत्या. त्या पैकी "राजस्थान मधून जाणारच आहात तर "दाल-बाटी" नक्की खा असा प्रेमळ सल्ला वजा धमकी" बायकोने दिली होती. जाताना हा बेत काही जमला नव्हता म्हणून तो आत्ता साधायचा ठरवला आणि मी "दाल-बाटी"ची ऑर्डर दिली. तुषारला त्यात काही रस नव्हता म्हणून त्याने नेहमी सारखंच डाळ भात आणि रोटी आणायला सांगितलं. उभ्या जन्मात मी कधी दाल-बाटी खाल्लं नव्हतं, फक्त ऐकून होतो, त्यामुळे कुतुहूल होतच. एक पोऱ्या, ५-६ कणकीचे मोठे गोळे असलेली थाळी घेऊन आला आणि माझ्या समोर ठेवून गेला. मी आपला घुम्या सारखा हे काय आणून ठेवलं समोर, असं म्हणून याचं करायचं काय? हे खायचं कसं? याचा विचार करू लागलो. शिवाय त्यातला एक गोल हातात घेऊन खेळू लागलो. तुषारचा डाळभात येई पर्यंत हातातला गोळा अर्धा केला. एक त्याला दिला आणि एक स्वतः खाऊ लागलो. अर्धा खाल्ला म्हणून काय? सगळेच कोण असं खाणार होतं? मी ढाब्याच्या मालकाकडे प्रश्नार्थक नजरने पाहू लागलो. बहुदा माझी मनस्थिती त्याला कळली असावी. त्याने लगेच पोऱ्याला काहीतरी सांगितलं आणि दाल घेऊन पाठवलं. तो हिरो आला आणि थाळीतल्या गोळ्यांचा चुरा करून त्यात दाल घातली. "अभी मेरेको समझा, दाल-बाटी कशी खातात ते" असं मनात म्हणालो आणि केली सुरुवात हाणायला. मस्त चव होती. तो हिरो पुन्हा आला आणि कढी चाहिये क्या? म्हणून त्याने विचारलं. तिची पण चव बघावी म्हणून मी हो म्हणालो आणि पुढे काही म्हणायच्या आतच पठ्याने वाटी वगैरे मध्ये न देता सरळ, आहे त्या थाळी मध्ये एक डाव ओतला. आता अर्ध्या थाळीत दालबाटी आणि अर्ध्या थाळीत ती कढी. या दोनीही पदार्थांची एकरूप होण्यासाठी लगबग सुरु झाली आणि मी शक्य तोवर त्यांचा डाव हाणून पडायला लागलो. दालबाटी खायची आणि कढी ओर्पायची. जेव्हा थाळी रिकामी व्हायला लागली तेव्हा मालक म्हणाला "साब और चाहिये क्या, गरम गरम है? आणि भट्टीतली बाटी कडू लागला. ते बघून राहवलं नाही आणि मी उत्साहात दे म्हणालो. लगेच आणखी २-३ बाटी आमच्या पुढ्यात पेश झाल्या. अडवा हात मारला त्यावर आणि एकदाची काय ते दालबाटी खाऊन तृप्त झालो. त्याच ढाब्यावर मग थोडा आराम केला आणि पुढे निघालो.
उदयपूर सोडताना
                  दुपारचे १२ वाजून गेले होते. प्रवास सुरु झाला. पावसाळा चालू आहे याचा मागमूस सुद्धा नव्हता. गरम वारा अंगावर घेत गाडी चालवत होतो. कुठे दोन दिवसा पूर्वी धो-धो पाऊस पडताना बघितलेला आणि कुठे हे जीव घेणे उन. समोर दिसत असलेल्या काळ्या पट्ट्या वरून सनाट निघालो. उन्हामुळे रस्ता चांगलाच तापला होता आणि त्यात जड वाहने जाऊन जाऊन, डांबर वितळून रस्त्यावर दोन ट्रॅकच तयार झाले होते. थोडक्यात लांबच लांब असेलेले दोन खड्डे. एकदा एक ट्रॅक पकडला कि जो पर्यंत एखादा ट्रक ओलांडायची वेळ येत नाही तो पर्यंत ट्रॅक सोडायचा नाही. वाहनांना ओवरटेक करताना जाम पंचाईत व्हायची. धडपडण्याची भीती वाटायची. पण नशिबाने तसं काही झालं नाही. रखरखीत उन्हात कुठेहि न थांबता एका मागून एक गावे मागे टाकत आम्ही हलोल कडे सरकत होतो. डोक्यावरचा सुर्य हळू हळू पश्चिमेकडे कलू लागला होता. दुपारी २ - २.३० ला पुन्हा एके ठिकाणी चहासाठी थांबलो. ५-१० मिनिटे गाडीला पण  थंड होऊ दिले आणि निघालो. NH८ वर असलेले सामलाजी (एक गाव) ओलांडताच तो ओळखीचा फाटा दिसला, NH८ सोडला आणि लगेच वळलो. समोर पाटी दिसली, "वडोदरा २१२ km". मुक्कामाचं ठिकाण आपल्या टप्यात आहे याची जाणीव झाली. राजस्थान मागे राहिलं होतं आणि गुजरात स्वागत करत होतं. मागल्या वेळे प्रमाणेच अहमदाबादला फाट्यावर मारून थेट बडोद्याला जायचं होतं आणि बडोद्याच्या ३५ km अलीकडे, वाटेत हलोलला मुक्काम ठरला होता. उन्हं उतरायला लागली होती. कुठेतरी थांबावं असं वाटत होतं पण नेमकं ठिकाण (खाण्या पिण्याची सोय असलेले) सापडत नव्हतं. इथे नको पुढे बघू असं करत करत बरेच अंतर कापले आणि शेवटी एका गावात भेल-पकोडीची गाडी बघून थांबलो. त्या लहानश्या गावात, खालपासून वर पर्यंत जवळ पास काळ्या रंगाचे किंवा तत्सम गडद रंगाचे कपडे घातलेले आम्ही दोघे आणि तशाच काळ्या कुट्ट आमच्या गाड्या दिसल्यावर लोकं आश्चर्याने बघत होती. एव्हाना आम्हाला याची सवय झाली होती. आम्ही आपलं नॉर्मल राहून भेळेचा स्वाद घेतला आणि निघालो. जेव्हा निघालो तेव्हा पश्चिमेला तांबड पसरलं होतं, सुर्य अस्ताला चालला होता. अंधार पडायला लागला होता पण रस्त्याची काळजी अजिबात नव्हती. एकदम चकाचक रस्ता आणि रस्त्यावर भरपूर पाट्या असल्यामुळे चुकण्याचं काही कारण नव्हतं. जेव्हा गोधरा जवळ पोहोचलो तेव्हा सुर्य मावळा होता. हलोल आणखी ५०-५५ km लांब होतं. अंधार मी म्हणायला लागला आणि एक नवीन त्रास सुरु झाला. रस्त्याच्या दोनीही बाजूला शेती आणि झाडी असल्यामुळे चिलटांचा आणि इतर किड्यांचा सुळसुळाट होता. हेल्मेटची काच खाली केली तर समोरच अंधुक दिसायचं आणि वर केली कि किडे डोळ्यात जाण्याची भीती. गोधरा ओलांडून पुढे जाऊ लागलो तेव्हा समोर आभाळ भरून आलेलं दिसलं. शिवाय हवेतही गारवा जाणवायला लागला. हलोलला पोहोचे पर्यंत पाऊस पडू नये म्हणून मी धावा करू लागलो. हेल्मेटची काच खाली ठेऊन वेळप्रसंगीच फक्त उघडून त्या परिस्थितही गाडीचा वेग काही कमी केला नाही. कारण थांबला तो संपलाच्या धर्तीवर वेग कमी केला तो भिजला असं वाटत होतं. तुषार पुढेच होता आणि मी मागे. जोरात गाडी चालवत होतो आणि माझ्या समोर झपकन काही तरी रस्ता क्रॉस करून गेले. थोडा वेग कमी करून निट पहायलं तर कोल्हा दिसला. असो... त्याला त्याच्या नशिबावर सोडून मी आमच्या नशिबाकडे पुन्हा लक्ष केंद्रित केले. ढगांचा गडगडाट ऐकू येत होता. काहीही झालं तरी पाऊस सुरु व्हायच्या आत हलोलला पोहोचणे गरजेचे होते म्हणून जोरात गाडी दामटत होतो. जर पाऊस सुरु झाला तर कुठेतरी थांबून रेनकोट घालण्याचे सोपस्कार करावे लागणार होते, ज्यात आणखी वेळ जाणार होता. शिवाय गाडीचा वेगही कमी ठेवावा लागला असता. पण नशिबाने आमची साथ दिली आणि आम्ही हलोल मध्ये पोहोचलो. गाडी हॉटेलच्या पार्किंग मध्ये लावत असतानाच, धो-धो करत तो आलाच. आम्ही इच्छित स्थळी पोहोचलो होतो. तसेच भिजत भिजत पटकन सगळं समान काढून गाडीला भिजायला मोकळी केली आणि आम्ही हॉटेल मध्ये गेलो. हॉटेलवाल्याने आम्हाला ओळखलं होतं. रूम घेतली, फ्रेश झालो आणि हॉटेलच्या खानावळी मध्ये जेवायला हजर. १५ दिवसा पूर्वीची इथली चव अजूनही जिभेवर होती. भरपेट उत्तम जेवण केलं आणि रूम वर आलो. "आम्ही आणखी दोन दिवसांनी येऊ", अस घरी फोन करून सांगितलं आणि झोपलो. ६३०-६३५ km चा मस्त प्रवास करून तो दिवसही सार्थकी लागला होता.

             दोन दिवसात घरी जायचं होतं,  त्या प्रमाणे सकाळी आरामात उठलो. आवरून हॉटेल मधेच नाष्टा केला आणि ९.०० ला निघालो. साधारण ३०० km वर असलेल्या दमन मधे मुक्काम करायचं ठरवलं होतं. बडोदा आलं आणि पुन्हा NH८ आम्हाला भेटला. आता मुंबापुरी पर्यंत तोच साथीला राहणार होता. बडोदा ओलांडून थोडेच पुढे गेलो असू आणि समोर क्षितिजा पर्यंत काळे ढग दाटून आलेले दिसले. आता पुढे कितीवेळ पाऊस लागेल हे सांगता येणार नव्हते. चंडीगड मधून निघाल्या पासून दोन दिवस हुलकावणी दिलेला पाऊस आज आमच्या समोर येउन ठाकला होता. मी अजून आहे, मी अजून आहे!!! असं आम्हाला सांगत होता. लेहला जाताना आम्हाला एवढं  झोडपलं होतं याने कि आता आम्ही बेफिकीर होतो. जसं जसं पुढे जाऊ लागलो तसं तसं अंधारून यायला लागलं. घड्याळ, सकाळचे ९ वाजल्याचे सांगत होते आणि वातावरण संध्याकाळचे ७.०० वाजल्याचे खुणावत होते. समोर रस्ता ओला झालेला दिसत होता. आम्ही पावसाच्या टप्यात आलो आणि टन!!! टन!!! हेल्मेटवर मोठ्ठे मोठ्ठे थेंब आदळायला सुरुवात झाली. दोघांनीही गाडी थांबवून रेनकोट चढवला आणि लढायला तयार झालो. थेट दमनला थांबण्याचा निश्चय करून तिथून निघालो. पाऊस धो-धो कोसळत होता आणि आम्ही त्याचा प्रतिकार करत शक्य तितक्या जोरात गाडी पळवत होतो. पावसाचा जोर वाढला होता त्यामुळे रस्त्यावरील दुचाक्यांची आधीच कमी असेलेली गर्दी जवळपास नाहीशी झाली होती. आमच्या मधी मधी करणारे कोणीच नव्हते. उलट आम्हीच ट्रक वाल्यांच्या मधी मधी करून त्यांना मागे टाकून पुढे जात होतो. नंतर नंतर तर तो इतका जोरात पडू लागला कि हेल्मेटच्या काचेतून पुढचं अगदीच धुसर दिसू लागलं. उगाच कुठे धडपडायला नको म्हणून हेल्मेटची काच वर केली.  चेहऱ्यावर पडणारे पावसाचे थेंब आणि शेजारून गेलेल्या वाहनांचे शिंतोडे सहन करत गाडी चालवत होतो. बराच वेळ पावसात गाडी चालवली. ४० - ५० km  गाडी चालवून झाली, पावसाचा जोर कमी जास्त व्हायचा पण तो कधी थांबला नव्हता.  समोर दिसणारा काळा ढग कधीही न संपणारा वाटत होता. रेनकोट घालून सुद्धा आम्ही पूर्ण भिजलो होतो. साला!!! कसल्याही मटेरीयलचा रेनकोट आणला असता तरी भिजलोच असतो असा त्या पावसाचा आवेग होता. अखेर भरूचला नर्मदा ओलांडल्यावर त्याने विश्रांती घेतली. नर्मदेचा पूल क्रॉस करून थोडंच पुढे आलो असेन तेव्हा माझ्या गाडीतून खाड!!! खडक!!! खाड!!! खडक!!! असला काहीतरी आवाज यायला लागला. तसा तो १-२ तास आधी पासूनच येत होता पण आता त्याची तीव्रता वाढली होती. गाडी चालवताना जाणवलं कि जेव्हा ती थरथराट जास्त करायची तेव्हा जास्त आवाज करायची. गाडी बाजूला घेतली आणि निरीक्षण केलं पण काहीच सापडायला तयार नव्हतं. शेवटी, बघू पुढे असं म्हणून निघालो. पावसाने उघडीप घेल्यामुळे छान वाटतं होतं. वेग थोडा कमी करून!!! म्हणजे ९० चा ७० - ८० करून आरामात पुढे जात राहिलो. कारण त्या वेगाला गाडीचं थरथरण्याचं प्रमाण कमी होतं. सुरत आणखी २५ -३० km लांब होतं आणि आम्हाला करमणुकीच एक साधन गवसलं. का कुणास ठाऊक? पण एक हिरो TVS Access घेऊन आमच्याशी शर्यत करू लागला. तो आम्हाला मागे टाकून पुढे जायचा आणि पुन्हा आपोआप कधीतरी मागे पडायचा. आम्ही काही वेळेला त्याला पुढे जाऊन देत होतो. काही वेळा जाणून बाजून त्याला मागे टाकत होतो आणि पुढे जाऊच देत नव्हतो. काही वेळेला त्याच्या थोडेच पुढे राहत होतो जेणे करून त्याला वाटावं आता ओवरटेक करणार पण त्याला तसं करता येत नव्हतं. सुरत येई पर्यंत हा खेळ चालू राहिला. शेवटी तो सुरतकडे निघून गेला आणि आम्ही सरळ दमनकडे.

         
          सुरतच्या फाटा मागे टाकून थोडेच पुढे आलो होतो तेव्हाच पावसाने पुन्हा एकदा आम्हाला गाठलं. आताशी कुठे आम्ही थोडेसे वाळलो होतो तर पुन्हा हा भिजवायला हजर झाला होता. पुन्हा तेच सगळं रिपीट. राष्ट्रीय मार्ग ८ (NH८) खूपच मस्त बांधला आहे. प्रवास करणाऱ्याला कुठेही आडकाठी होऊ नये म्हणून छोट्या छोट्या गावांना वळसा घालून केलेले बायपास किंवा त्या गावातून जाणाऱ्या मार्गावरच बांधलेले छोटे छोटे पूल केले आहेत. चकचकीत खाली वर करत जाणारा रस्ता आणि त्यावर जाणारे आम्ही दोघे. झक्कास एकदम!!! पाउस चालू होता आणि गाडी पळवणेहि चालूच होते. बघता बघता दमन आलं पण आम्ही दमनच्या फाट्यावर वळलोच नाही. कारण तिथल्या तिथेच थेट घरी जायचे ठरवले गेले. पावसात तसेच पुढे प्रवास करत राहिलो. आता घरी जायचे ठरल्यामुळे गाडीचा वेग पुन्हा वाढला. पाऊस कोसळत होता आणि आम्ही दनादन गाडी चालवत होतो. एक एक गाव, एक एक शहर मागे टाकत पुढे पुढे सरकत होतो. जेव्हा महाराष्ट गुजरात सीमेवरचा भला मोठा टोलनाका आला तेव्हा लेहला जाताना इथे थांबलो होतो तो दिवस आठवला. बरोबर १९ दिवसांनी आम्ही पुन्हा त्याच टोलवर आलो होतो. जाताना 'लेह' वारी एक स्वप्न होतं आणि आज येताना ते स्वप्न सत्यात उतरलं होतं. टोल नाक्यावर न थांबता तसेच भिजत पुढचा प्रवास चालू ठेवला तो पार अगदी विरार पर्यंत. विरार आल्यावर पुन्हा एकदा गाडी आवाज करू लागली. तेव्हा मात्र आवाज ऐकून माझ्या डोक्याला मुंग्या आल्या. वारी संपत आली आणि अन अगदी शेवटला हि का उगाच त्रास देऊ लागली? म्हणून मी कासावीस झालो होतो. आडोसा वगैरे बघून थांबायची शुद्धच नव्हती. जिथे जाणवलं तिथेच गाडी कडेला थांबवली आणि नीट बघू लागलो. वरून पाऊस पडत होता आणि आम्ही दोघे अगदीच नवखे डॉक्टर रस्त्याच्या कडेला थांबून पेशंट्ला बघत होतो. त्यालाही कळत नव्हतं काय भानगड आहे ते. कोणता तरी भाग सैल झाला आहे आणि गाडी रेझ केली कि वाजतो आहे एवढच समजत होतं. गाडी रेझ करत करत जमेल तिथे सगळी कडे हात लावून बघत होतो. तेव्हा समजलं प्रवासात कधीतरी बॅटरीचं कुलूप तुटून पडलं होतं आणि झाकण अधांतरीच आहे. म्हणून मग झाकण गच्च दाबून धरलं आणि पुन्हा रेझ करून पाहिलं तर आवाज काही थांबला नव्हता. मुख्य समस्येचं निदान अजून बाकी होतं. पुन्हा नीट एक एक भाग बघायला सुरुवात केली. अनवधानाने एकदा पेट्रोलच्या टाकीवर जोर पडला आणि आवाज बंद झाला. दोनदा तीनदा चेक करून पाहिलं आणि खरी गोची कळली. पेट्रोलच्या टाकीचा नट सैल झाला होता.त्यामुळे ती थरथर कापून आवाज करत होती. लगेच तो घट्ट पिळला आणि आवाज बंद झाला. आता गाडी कितीही रेझ केली तरी उगाच कशीपण आवाज काढत नव्हती. भलं मोठं वाटणारं ऑपरेशन छोटसच निघालं. थोडक्यावर निभावलं म्हणून देवाचे आभार मानले आणि आम्ही पुढे निघालो. धो-धो पडणारा पाऊस, जोरात गाडी चालवायची मस्ती आणि लवकर घरी पोहोचणे या सगळ्याच्या नादात सकाळ पासून काहीच खाल्लं नव्हतं. भूक भरपूर लागली होती. पण आमच्या साहेबांनी ढाब्यावर जेवण्याची फर्माईश केली. वसई मागे पडलं पण हवा तसा चांगला ढाबा सापडला नाही. मग साहेबांना सांगितल, "आणखी थोडी कळ काढा, आता पनवेल नंतरच चांगला ढाबा मिळेल. ठाण्यामधे सगळी हाटेलच असतील". साहेब तयार झाले. घोडबंदर रोडला लागलो तसा पाऊस गायब झाला. पुढे मुंब्र्या मार्गे पनवेलला आलो आणि पनवेल ओलांडताच एका ढाब्यावर जेवायला थांबलो. एव्हाना ५.०० वाजले होते. घरच्यांना जोर का झटका धीरसे देण्यासाठी फोन करून सांगितलं, "आम्ही आजच दोन  तासात घरी येत आहोत". बऱ्याच वेळा प्रवासात आम्ही थांबू तिथे सवडीने घरी फोन करून बित्तम्बात्मी देत होतो पण आज तसं काहीच केलं नव्हतं. सकाळ पासून ना फोन, ना मेसेज. त्यामुळे घरी मी येणार हे कळल्यावर लैच आनंदी आनंद झाला. असो… तर ढाब्यावर जेवलो आणि मग निघालो. वसई नंतर पाऊस बंद झाला होता. पूर्ण वाळलो होतो, तेव्हाच खंडाळ्यात पुन्हा आमचं पावसाने स्वागत केलं. मस्त बरसत होता. ओळखीच्या रस्त्यावरून भिजत येताना दोघांनाही कधी एकदा घरी पोहोचतोय असं झालं होतं. भर भर वाऱ्याला कापत एकदाचे आम्ही देहूरोडला (पुण्याचा बाह्यवळण मार्ग सुरु होतो तिथे)पोहोचलो. इथून पुढे आमचे रस्ते वेगळे होणार होते. तो त्याच्या घरी भोसरीला आणि मी चिंचवडला जाणार होतो. आम्ही थांबलो. वारी यशस्वीपणे आणि सुखरूप पूर्ण झाल्याचे एकमेकांना अभिनंदन केले आणि पुन्हा अशीच लांबची वारी करण्याचं मनात ठरवून आम्ही एकमेकांचा त्या दिवसाचा निरोप घेतला. मी चिंचवडकडे प्रस्थान केले. घराच्या ओढीने पुन्हा जवळपास ६०० km गाडी चालवली गेली. चंडीगडवरून निघाल्या पासून तिसऱ्या दिवशी घरी पोहोचणार होतो.
                      रात्री ८.३० ला गेटच्या आत शिरलो आणि पार्किंगमध्ये धडधड!!!! धडधड!!! बुलेटचा आवाज घुमायला लागला. गेले १९ दिवस तो आवाज, सतत, दिवसभर आमच्या कानात घुमत होता. आवाज ऐकून आई जवळ आली. घरी फोन करून "मी येतोय" असं आधीच सांगितलं असल्यामुळे ती आधीच खाली येऊन उभी राहिली होती. मी घरी आलो होतो. पाऊस रिपरिप चालूच  होता. बुलेट स्टँडला चढवली (हो बुलेट हि स्टँडला लावता येत नाही, ती चढवावी लागते) आणि आई कडे वळलो. तिला कडकडून मिठी मारायची होती पण दोन-दोन जर्कीन घालून सुद्धा पार भिजलो होतो. वर पासून खाल पर्यंत सगळी कडून टप-टप पाणी गळत होतं. आपला लेक सुखरूप आणि धडधाकट घरी परत आलेला पाहताना तिच्या चेहऱ्यावरच समाधान आणि तिला झालेला आनंद मला अजूनही आठवतो. हळू हळू त्या धुडावरचा सगळा बोजा मी उतरवला आणि तिला (बुलेटला) रिकामं केलं. आता तिलाही कंटाळा आला असेल, किती दिवस तिने ते समान काहीही न तक्रार करता वागवलं होतं.

लेह मधून करून आणलेले दोन टी शर्ट्स
असो... तिला आराम करायला सोडून, सगळा पसारा उचलला आणि घरात गेलो. बाबा आणि शुभदा वाट बघतच होते. सगळा प्रवास उत्तम होऊन मी घरी परत आल्याचा त्यांनाही खूप आनंद झाला होता. झालं, थोडा वेळ शांत बसलो आणि एक एक बॅग उघडायला सुरुवात केली. सगळं समान बाहेर काढलं आणि आधी होता तो पसारा आणखी वाढवला. मग हळू हळू परत सगळं आवरता आवरता भरपूर गप्पा झाल्या. मस्त गरम गरम जेवलो आणि झोपायला गेलो. आयुष्यभर लक्षात राहील असा एक प्रवास संपला होता.


समाप्त














'लेह' वारी, भाग ५


<< भाग ४


सकाळी लवकर उठलो आणि आवरलं. 'लेह'ला राम राम म्हणायची वेळ आली होती, शिवाय घराचीहि ओढ लागली होती. या वेळी अर्धवट राहिलेल्या गोष्टी पुढच्या वेळी पूर्ण करण्याचे मनोमन ठरवून साधारण ८.०० ला आम्ही 'लेह' सोडलं. घरून निघाल्यापासून इथ पर्यंत प्रत्येक वेळेस ठरलेल्या आराखड्याचे १२ वाजले होते. त्यामुळे 'लेह'ला मुक्कामी असताना परतीचा प्रवास एकदम आरामात जमेल तसा करायचा ठरवलं. त्यात चंडीगड पासून पुढे घरी जाण्यासाठी किमान ४-५ दिवस तर घ्यायचेच. उगा पळापळी नाही करायची असही ठरलं. तुषारच्या वडिलांनी तर गेल्या मार्गेच परत या म्हणजे तुमचं ३०० km अंतर वाचेल असही सुचवलं. श्रीनगर-जम्मू मार्गे गेलं काय आणि मानली मार्गे गेलं काय, चंडीगडला पोहोचायला ४ दिवस लागणारच होते. फक्त मानली मार्गे गेलो तर ३०० km वाचणार होते. पण आल्या मार्गी परत मानलीला जाणे म्हणजे वेडेपणा होता. नवीन ठिकाणी, नवीन लोकांचा, नव्या जगाचा अनुभव घेणे आमच्या रक्तातच आहे. तुषारनेही फार आढेवेढे न घेता श्रीनगर-जम्मू मार्गे जायचं मान्य केलं आणि त्या प्रमाणे आम्ही श्रीनगरच्या दिशेने दौडू लागलो. रम्य सकाळी कोवळ्या उन्हात आम्ही निघालो होतो. वातावरण अगदी मस्त होतं. आवडेल त्या ठिकाणी थांबत मजेत प्रवास चालू झाला. माझा कॅमेरा आधीच धारातीर्थी पडल्यामुळे मी मोबाईलवर फोटो काढत होतो तर तुषार नेहमी प्रमाणे कॅमेरा घेऊन स्वार झाला होता. सकाळी निघताना वाटेत काय काय बघण्यासारखं आहे, हे हॉटेलच्या संस्थापकाला विचारायला मी विसरलो नाही. त्यामुळे पहिला ऑफीशियल थांबा होता मॅग्नेटीक हिल. खूप ऐकून होतो याच्या बद्दल. गाडी आपोआप खेचून घेतो हा डोंगर अशी बातमी कळली होती. त्यामुळे कुतुहूल इतकं होतं कि, गाडीवर चाललो असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या प्रत्येक डोंगराला हाच असेल का तो डोंगर? हाच असेल का तो डोंगर? असं मनाला विचारात होतो. रस्ता चकाचक होता त्यामुळे गाडीचा वेग चांगला ठेवला होता आणि असेच जात असताना रस्त्यावर मोठा चौकोन आखलेला दिसला. स्त्याच्या दोनीही बाजूला मॅग्नेटीक हिलची पाटी होती. आम्ही तिथे थांबलो. गाडी बंद करून निवांत थांबलो, म्हंटल बघू कशी खेचली जाते ते. पण कसलं काय ओ... ते धूड ढिम्म सुद्धा हलल नाही. आहे त्या जागीच, आहे तशी लावली होती, तशीच. तुषार म्हणाला मी डोंगरावर रस्ता आहे तिथ पर्यंत जाऊन येतो आणि तसा तो गेला पण. पार अगदी वर रस्ता संपे पर्यंत गेला आणि मागे वळून परत आला. त्यालाही काही जाणवलं नाही. मला तर तिथल्या इतर डोंगरांप्रमाणेच हा हि डोंगर तितकाच भक्कास पण आकर्षक वाटला. असो... आम्ही तिथून पुढे निघालो आणि थांबलो ते एका संगमावर. नद्यांची नावं आठवत नाहीत पण दरी मध्ये दोन नद्यांचा संगम होता तिथे आम्ही थांबलो. छान दृश्य होतं. दोनचार क्लिकक्लिकाट केले आणि तिथून काढता पाय घेतला.





जेव्हा संगम पहिला तेव्हा आम्ही डोंगरावर होतो पण खाली उतरून आलो तेव्हा संगमाने तयार झालेली ती नदी आमच्या साथीला आली होती. खळखाळाट करत वाहणाऱ्या पाण्याबरोबर शर्यत लावून आम्हीहि जोरात निघालो होतो. मजल दर मजल करत एक एक छोटं गाव मागे टाकत आम्ही पुढे जात होतो. बऱ्याच गावातले रस्ते खूपच खराब होते. सगळी कडे रस्त्याचं काम चालू होतं. पण दोन गावांना जोडणारा रस्ता मात्र एकदम मस्त होता. तस का होतं या कोड्याचं उत्तर काही मिळालं नाही. मधे मधे सेनेचे ट्रक येता जाता दिसत होते आणि खारदुंगलाला जशी पुढे जायला जागा दिली तशी आताही देत होते. 'लेह'च्या दिशेने निघालेले आमच्या सारखेच बरेच बुलेट वेडे, आम्हाला अंगठे दाखवून ("थंप्स अप") पुढे जात होते. आम्हीहि तेच करत पुढे चाललो होतो. असेच जात असताना पुढे एके ठिकाणी गाड्यांची रांग लागलेली दिसली. आम्हाला ओवरटेक करून पुढे गेलेल्या चारचाक्या इमानदारीत एका पाठोपाठ थांबलेल्या दिसल्या. आम्ही आपलं राजरोस पणे त्यांच्या शेजारून थेट पुढे पर्यंत गेलो. पाहतो तर काय? दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद झाला होता. BRO वाले रस्ता दुरुस्त करण्यात मग्न होते आणि आम्ही ते कसं काम करत आहेत हे पाहण्यात दंग झालो होतो. गाडी स्टँडला लावली आणि पुढे गेलो. मोठ मोठे दगड ते यंत्राने नदीत ढकलत होते. रस्त्यावर पसरलेला राडारोडा बाजूला सरकवत होते. एकदा खाली पडलेला दगड पाहावा म्हणून कडेला जाऊन बघितलं तर तो दगड नाहीसा झाला होता. त्या नदीने त्याला लीलया आपल्यात सामावून घेतलं होतं. तेव्हा त्या नदीला नुसताच उथळ पाण्याचा खळखाळाट नसून ती खोल पण होती हे जाणवलं. पुन्हा मागे आलो. एक सैनिक त्यांच्या गाडीतून खाली उतरून ते सगळं पाहत होता. त्याच्या जवळ जाऊन बोलावंस वाटलं म्हणून पुढे गेलो तर तो नेमका महाराष्ट्राच्या मातीचा निघाला. कोपरगावचा. गप्पा सुरु झाल्या. (सगळ्याच इथे द्याव्यात कि नको अशा संभ्रमात आहे म्हणून जास्त तपशील देत नाही.) तो सुट्टी संपली म्हणून परत आला होता आणि पुढे कारगिलला चालला होता. आमच्या गाड्या बघून आणि बाकी प्रवासाची माहिती ऐकल्यावर त्याने तर आम्हाला त्यांच्या छावणीत आमंत्रण पण दिले. (पण आमच्या कडे तेवढा वेळ नव्हता म्हणून ते राहून गेले). असो... थोड्या वेळाने रस्ता नीट झाला आणि आम्ही त्याला निरोप देऊन तिथून निघालो.




निघाल्या पासून ३ तास झाले होते आणि काहीही खाल्लं नव्हतं. म्हणून मग एका चांगल्या ढाब्यावर थांबलो आणि यथेच्छ जेवण केलं. थोडा आराम केला आणि निघालो. थोडं अंतर कापल्यावर आम्ही एका दरीत प्रवेश केला. दुतर्फा उंचच उंच डोंगर आणि मधून जाणारे आम्ही आणि आणखी काही गाड्या. पुढचा रस्ता कसा असेल असा विचार चालू असतानाच बाजूच्या डोंगरावर थोडं वर लक्ष गेलं आणि सेनेच्या ट्रक्सची भली मोठी रांग नागमोडी वळणं घेत हळू हळू वर चढताना दिसली. एक ट्रक जाईल एवढाच रस्ता असलेला तो घाट होता. आम्ही घाट चढायला सुरुवात केली आणि लवकरच त्यांच्या जवळ पोहोचलो. एके ठिकाणी सगळ्याच गाड्या थांबल्या होत्या. समोरून पण वाहनं आल्याने, पुढे जाण्यासाठी दोनीही बाजूंचा प्रयत्न चालू होता. घाटात काही ठिकाणी दोन ट्रक एकमेकाच्या बाजूला मावतील एवढी जागा होती. सेनेच्या अनुभवी चालकांनी हे सगळं ओळखून त्यांच्या गाड्या आधीच थांबवल्या होत्या. पण आम्ही फटफटी घेऊन वाट काढत, कधी दरीच्या बजूने, कधी कड्याच्या बाजूने कुठेही न थांबता पुढे निघून गेलो. पुन्हा मजेत प्रवास सुरु झाला. डोळ्यात सगळं साठवून पुढे जात असताना भुसभुशीत मातीचा एक डोंगर दिसला. निदान तसा भास तर नक्कीच झाला. असं वाटलं जर या डोंगरावर कोणी उडी मारली तर तो तिथे वर उभा न रहाता थेट डोंगराच्या पोटात तळच गाठेल. आठवण म्हणून त्या डोंगराला कॅमेरा मध्ये कैद केलं आणि पुढे निघालो. पुढे लामायुरू मोनास्ट्रि येई पर्यंत कुठेही थांबलो नाही. निर्जन ठिकाणी वसलेली हि मोनास्ट्रि खूपच जुनी आहे. एक दोन दिवस इथे राहायला हवं होतं असाही एक विचार मनात येउन गेला. पण तो नुसताच विचार राहिला. थोडा वेळ लांबूनच तिचं दर्शन घेऊन आम्ही पुढे गेलो. घाट लागल्या पासून रस्त्याचा चांगल्या वाईटाचा खेळ चालू झाला होता. कधी चकचकीत डांबरी तर कधी भरपूर मातीने माखलेला मातीचाच. समोर ट्रक असेल तर काय विचारायलाच नको. धुळीच्या ढगातून गाडी चालवण्या शिवाय पर्यायच नव्हता. भरपूर धूळ खाऊन खाऊन आम्ही शेवटी फोटू'ला' टॉपवर (उंची - १३४८० फुट) पोहोचलो. तिथे आधीच एक नवीन लग्न झालेलं जोडपं एकमेकाचे फोटो काढण्यात दंग होतं. भरपूर वारं सुटलेलं आणि दुसरं चीटपाखरू हि नव्हतं. ते फक्त दोघेच होते आणि आम्ही तिथे पोहोचून त्यांच्या एकांताची वाट लावली. आता आम्ही चौघे होतो तिथे. आपसूकच नवरोबा, त्या दोघांचा एक फोटो काढावा हि विनंती घेऊन गप्पा मारण्यासाठी जवळ आले. फोटो वगैरे काढून झाल्यावर गप्पात कळलं कि तो हिरो लग्नाच्या बायकोला आणि तिच्या सवतीला (फटफटीला) घेऊन हिंडण्यासाठी गुजरात वरून आला होता आणि श्रीनगर वरून प्रवास सुरु करून लेह'ला' चालला होता. मला हेवा वाटला त्याचा. बायकोला आणि फटफटीला घेऊन यायचं म्हणजे कमालच केली गड्याने. असो... सुखरूप प्रवासाच्या त्यांना शुभेच्छा देऊन आम्ही (ते पण) तिथून निघालो.



फोटू'ला टॉप उतरायला सुरुवात केली आणि आम्ही धुरळ्या मध्ये गुडूप झालो. थोडेच खाली उतरलो असू कि पुन्हा आमच्या समोर  BRO वाले दत्त म्हणून उभे राहिले होते. घाटात दरड कोसळली होती ती दूर करण्याचं काम चालू होतं. तिथे थांबून त्यांचा काम बघण्यापलीकडे आम्हाला काही काम नव्हतं. इतक्यात सेनेचे ट्रक मागून धुरळा उडवत आले आणि जवळ येउन थांबले. पण समोरून एक अतिशहाणा क्वालिसवाला आला. कुणालाही न जुमानता सरळ मुरुमाड रस्त्यात घुसला आणि त्याची गाडी फसली. गाडी ताणत होता जोरात पण गाडी जाग्यावरच. चाकं जाग्यावरच फिरत होती. एक तर काम संथ गतीने चालू होतं आणि त्यात या शहाण्याने व्यत्य आणलं होतं. शेवटी आतली दोघं खाली उतरली आणि गाडी ढकलू लागली. कशी बशी ती मागे पुढे घेत, गाडी निघाली. ढकल काम करून दमलेले दोघे गाडीत बसले आणि ते निघून गेले. BRO वाले आले आणि त्यांनी तो मुरूम नीट करून आम्हाला जायला रस्ता तयार केला. या BRO ने मनाली सोडल्या पासून आता पर्यंत कितीतरी ठिकाणी आम्हाला मदत केली होती. त्या साठी त्यांना सलाम. असो... पुढे रस्ता एकदम झक्कास लागला. त्यामुळे आपसूकच गाडीचा वेग वाढला. दोन तास आम्ही न थांबता गाडी चालवत होतो. घाट नव्हता पण वळणावळणाच्या रस्त्यावर गाडी चालवून कंटाळा आला होता. आपल्या इथे जशी वड-पिंपळाची झाडं रत्याच्या कडेने असतात तसं विसाव्यासाठी सावली देणारं एकही झाड आम्हाला रस्त्यात सापडेना. म्हणून मग एके ठिकाणी मोठ्ठा बोर्ड दिसला त्याच्या सावलीत थांबलो. गाडी बाजूला लावली आणि निवांत खाली मांडी घालून दोघेही जमिनीवर बसलो. गप्पा मारत अर्धा तास काढला. आज कमीत कमी कारगिलला तरी पोहोचायचं ठरवलं होतं.




थोडा क्षीण कमी झाल्यावर आम्ही निघालो. रमत गमत आरामात जायला सुरुवात केली. फोटूला टॉपला चढायला सुरुवात केली तेव्हा नदीने आमची साथ सोडली होती, ती पुन्हा आमच्या साथीला आली. तीच नदी होती कि दुसरी ते नाही माहिती. पण बरोबर पाण्याचा प्रवाह असला कि छान वाटतं गाडी चालवायला. मधेच एके ठिकाणी काही ट्रक वाले नदी जवळ ट्रक धुताना दिसले. ते पाहून आमच्या साहेबांना पण गाडी धुण्याची हुक्की आली. संध्याकाळचे ४ वाजले असतील आणि कारगिल गाठायचं होतं म्हणून मी न थांबण्यासाठी भांडत होतो आणि हा बाबाजी उशीर झाला तरी चालेल पण गाडी धुवायची म्हणून अडून बसला होता. गाडी धुवून काही फायदा नाही परत धुळीने माखणार आहे हे किती तरी वेळा त्याला सांगितलं पण गडी ऐकेचना. शेवटी म्हंटल जा धु तुझी गाडी, मी थांबतो इथेच तुझी वाट बघत, मला नाही गाडी धुवायची. पण तेव्हा काय झालं कुणास ठाऊक, साहेब लगेच निघण्यासाठी तयार झाले पण थोडं चिडूनच. त्याचा पारा काही उतरला नव्हता. गाडीला किक मारली आणि गेला सुसाट पुढे निघून. मी आपला, तो दिसतोय इतक्या अंतराने गाडी चालवत राहिलो. पण एक घोळ झाला. गाडी चालवताना माझ्या लक्षात आलं कि मागच्या चाकात काही तरी आवाज येतोय. एकदा गाडी थांबवून पाहिलं पण काही कळलं नाही म्हणून पुढे जाऊ लागलो. तुषार एव्हाना बराच पुढे निघून गेला होता. मागच्या चाकातून आवाज येणे चालू होतेच. शेवटी एकदम खाड !!! खाड !!! खाड्याक !!!! असला काही तरी भयंकर आवाज आला आणि माझा तोल थोडा गेला. गाडी सांभाळली, लगेच थांबलो आणि नीट पाहू लागलो. सगळीकडे पाहताना नजर चेन वर गेली. तर तिच्यावर थोड्या थोड्या अंतराने कापडाचे तुकडे अडकलेले दिसले. नक्की काय झालं ते मला समजलं होतं. सॅडल बॅगचा एक बंद चेन मध्ये अडकून तुटला होता आणि त्याचे तुकडे तुकडे होऊन सगळ्या चेन मध्ये अडकले होते. हळू हळू चाक फिरवत एक एक तुकडा काढून टाकला. एक दोन तुकडे राहिले होते तेव्हड्यात तुषार परत येताना दिसला. तो आल्यावर झाला प्रकार सांगितला. तो आला तेव्हा त्याचा राग कमी झाला होता. पुन्हा सगळी चेन व्यवस्थित बघितली आणि एकही तुकडा मागे राहिला नाही याची खात्री केली. गाडीवर टांग टाकली आणि आम्ही दोघे पुढे निघालो. कारगिलला पोहोचे पर्यंत ५-५.३० झाले होते. तुषार म्हणाला जाऊ पुढे द्रास पर्यंत. पोहोचू आरामात. मग काय पेट्रोल भरलं आणि आम्ही लागलीच द्रास कडे प्रस्थान केले. कारगिल सोडल्यावर द्रासकडे जाताना एके ठिकाणी "Enemy is watching you" हा बोर्ड आहे, असं एका मित्राने सांगितलं होतं. रस्त्यावरिल पाट्यांकडे लक्ष ठेवूनच होतो. नदी साथीला होतीच. आम्ही दरीतून पुढे पुढे जात होतो आणि आमच्या उजव्या बाजूला नदी होती. रस्ता तसा बरा होता. असेच जात असताना आम्हाला तो बोर्ड दिसला. तो बोर्ड दिसला तेव्हा पासून नदीच्या पलीकडील डोंगरावरून खरच आपल्याला कोणी पाहत असेल का? हा विचार करू लागलो पण कोणीच दिसलं नाही. तोच विचार डोक्यात घोळत असताना दरी संपली आणि डोंगररांग लांब गेली. अंधार पडायला लागला तेव्हा आम्ही द्रासला पोहोचलो. द्रास !!! भारतीय सिमेवरचं सर्वात महत्वाचं ठिकाण. १९९९ मध्ये जिथे भारताने, पाकिस्तान विरुद्ध युद्ध जिकून घुसखोरांना हाकलून लावले ते ठिकाण.





द्रास मधील हुतात्मा स्मारक पाहण्याचं आधीच ठरलेलं होतं पण ते दुसऱ्या दिवशी. संध्याकाळचे ७ वाजले होते त्यामुळे आधी राहण्याची आणि पोटपाण्याची सोय बघायला प्राधान्य होते. JKTDCची सोय होती पण तिथे आधीच बुकिंग फुल होतं. एका शाळेची ट्रीप आल्यामुळे एकही खोली रिकामी नव्हती. त्याच्याच सांगण्यावरून जवळच्याच एका रस्त्यावरील हॉटेलचा पत्ता मिळाला. लगेच रस्त्यावर रात्रभर गाडी लावायची हा विचार मनात डोकावला आणि गाडीच्या सुरक्षेचं काय हा मोठ्ठा प्रश्न आमच्या समोर उभा राहिला. तिथल्या तिथेच संस्थापाकाला विचारणा केली तर तो म्हणाला काही होत नाही. काळजी करू नका. पण आमच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून शेवटी म्हणाला पाहिजे असेल तर आमच्या इथे आत आणून गाडी लावा. मी परवानगी देतो. तो असं म्हणाला तेव्हा बरं वाटलं आणि आम्ही हॉटेलचा पत्ता घेऊन तिथून बाहेर पडलो. JKTDC पासून ते हॉटेल जेमतेम ५०० मीटर वर असेल. गाडी लावून तुषार रूम पाहायला गेला. थोडा निराश होऊनच परत आला. पण काय करणार? नाईलाज होता म्हणून आम्ही रूम बुक केली. गाडी कुठे लावायची त्याला विचारलं तर हॉटेलवाला म्हणाला लावा इथेच बँकेच्या समोर. काही होत नाही. समोर पोलिस स्टेशन आहे. रात्रभर एक पोलिस बाहेर खुर्ची टाकून बसलेला असतो. काळजी नका करू. काही होत नाही गाडीला. हॉटेल मालकाचं म्हणणं पटलं आणि घेतल्या गाड्यावर. समान सोडून वर जाऊन बघितलंतर रूम एकदम अंधारी. त्या १० X १० च्या अंधाऱ्या रूम मधे मिणमिणत्या बल्बच्या उजेडात रात्र काढायची होती. सगळं अवरल आणि फेरफटका मारायला बाहेर पडलो. हॉटेल जरी न आवडणारं असलं तरी हॉटेलचा मालक मात्र चांगला वाटला. माणुसकी नावाची चीज होती त्यात अस वाटलं. रूम मधून खाली आलो आणि पाणी प्यायला मागितलं. एक मुलगा लगेच शेजारिच जमिनीवर असलेल्या नळी मधून पाणी भरून घेऊन आला. पुढे.

मालक: ये जमीन से निकाली नेहर का पानी है!  मिनिरल वाटर से भी अच्छा है!
मी: हां वो तो है! लेकिन उस नली को बंद क्यो नाही करते!
मालक: कोई जरुरत नही!. पुरा सिझन चालू राहा फिर भी पानी आना बंद नही होगा!
मी (मनात): कसं होईल. एवढा बर्फ वितळत असतो. चुकून जास्त वितळला तर पाणीच पाणी चोहीकडे म्हणावे लागेल तुला.
मी (वास्तवात): तो हम लोग गाडी धो लेते है! चलेगा क्या ?
मालक: हां हां जरूर, क्यो नही !


बास आम्हला हेच हवं होतं. लगेच वर जाऊन चाव्या घेऊन आलो. दोघांनीही आपापल्या गाड्या धुवून घेतल्या. गाड्या धुवून झाल्यावर दोनीही एकदम जवळ जवळ लावल्या. मी एक मोठी चेन आणि कुलूप घेऊन आलो होतोच. घातली दोनीही गाड्यांच्या चाकामधे साखळी आणि लावलं कुलूप. एकतर समोर एक पोलिस बसलेला आणि शिवाय साखळी घालून कुलूप लावलेलं. गाडी आता आमच्या नकळत कुठेही जाणार नाही याची शाश्वती झाली. हे सगळं झाल्यावर आम्ही फिरायला गेलो. येताना एका STD मधे जाऊन घरी ख्याली खुशाली कळवली आणि ऐकून पण घेतली. पुन्हा हॉटेल वर आलो. जेवलो आणि झोपलो.
                           सकाळी जाग आली ती रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या ट्रकच्या आवाजानेच. खिडकीतून बाहेर डोकावलं तर समोर पोलिस स्टेशनच्या मागे भला मोठ्ठा डोंगर दिसला. वरती असलेल्या छोट्या छोट्या शिखारांमुळे उन सावलीची नक्षी तयार झालेली. लगेच ती कॅमेरा मध्ये साठवून घेतली. पटकन सगळं आवरलं आणि आम्ही बाहेर पडलो. हुतात्मा स्मारक बघायला पुन्हा उलटा ६ km मागे गेलो. प्रत्येक भारतीयाने जाऊन बघावं असं ते स्मारक, १९९९ मध्ये भारतीय जवानांनी दाखवलेल्या शौर्याचं प्रतिक दिमाखात तिथे उभे आहे. आपले जवान प्रतिकूल परीस्थित कसे लढले, त्यांनी काय काय पावलं उचलली आणि यश मिळवून दिले याची शौर्यगाथा तिथे मांडलेली आहे. संग्रहालयात खूप गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. त्यावेळच्या घडलेल्या घटना, आम्हाला एका सैनिकाने सांगितल्या. काल दिसलेल्या बोर्ड बद्द्ल त्याच्या कडे चौकशी केली तर म्हणाला तो असाच लावलेला आहे. LOC आणखी लांब आहे. चांगले २-२.३० तास तिथे सगळं बघण्यात गेले. तिथेच मग कॅन्टीनला पोट भर नाष्टा केला आणि पुन्हा रूमवर आलो. हॉटेलचा हिशोब मिटवला आणि द्रास मधून प्रस्थान केलं.






आजचा दिवस श्रीनगरच्या नावावर केलेला.  श्रीनगर फार काही लांब नव्हतं. निवांत पोहोचणार होतो म्हणून आरामात गाडी चालवत होतो. शेवटचं त्या निसर्गाला डोळ्यात साठवत पुढे जात होतो. परत या डोंगर दर्‍यां मध्ये भटकायचा योग लवकर येणार नाही याची जाणीव व्हायला लागली होती. दोनीही बाजूला उंचच उंच डोंगर आणि मधून जाणारे आम्ही दोघेच. छोट्या छोट्या चढउतारावरून मस्त हेलकावे घेत चाललो होतो. हवे तिथे थांबून मजा लुटत होतो. बघता बघता जोझी'ला' पासला पोहोचलो. हा शेवटचा पास आहे. या पुढे माणूस हळू हळू खाली उतरायला लागतो आणि समुद्रासपाटीच्या जवळ यायला लागतो. जोझीला ला थोडा वेळ गेला आणि आम्ही पुढे निघालो. पुढे गेल्यावर एक सैनिक वॉकी टॉकी घेऊन उभा राहिलेला दिसला आणि त्याने आम्हाला पुढे जाण्याचा इशारा केला. आणखी पुढे गेलो तर सगळ्या मोठ्या गाड्या ओळीने थांबलेल्या दिसल्या. गेट लागला होता. घाटात रस्त्यची रुंदी कमी असल्यामुळे आळीपाळीने गाड्या वर किंवा खाली सोडतात. जोवर वरचा सैनिक खालच्या सैनिकाला सांगत नाही तोवर. एकदा का वरच्या गाड्या खाली जायला लागल्या तर खालच्या गाड्या खालीच थांबतात. हेच पुन्हा उलटं खालच्या गाड्या वर जायला लागलं कि करतात. यालाच गेट लागणे म्हणतात. गेट लागला कि १-२ तास एकीकडच्या ड्रायवर लोकांना बसून राहण्याशिवाय पर्याय नसतो. दुचाक्यांना याचा काही फरक पडत नाही. गेट लागलेला असला तरी दुचाकीस्वरांना (स्वतःच्या जवाबदारीवर)  दुचाकी सकट पुढे जाऊन देतात. नेहमी प्रमाणेच कडेकडेने आम्ही एकदम पुढे गेलो. समोरून सैनिकी ट्रकांची एक रांग वर येताना दिसली. आम्ही थोडे पुढे जायचो आणि जागा बघून थांबायचो. एक दोन ट्रक पुढे गेले आणि जागा झाली कि पुन्हा पुढे जायचं. असं करत करत आम्ही खाली उतरलो. खाली उतरताना पुढे सोनमर्गचा रम्य नजरा दिसत होता. खाली उतरलो आणि आरामासाठी एके ठिकाणी थांबलो.










नदी पुन्हा आमच्या साथीला आली होती. थोड्या वेळाने तिथून निघालो. प्रवासात आम्ही मागे पुढे नेहमीच व्हायचो. कधी तो पुढे कधी मी. या वेळी मी पुढे होतो पण तो आरशात दिसत राहील, एवढं अंतर ठेवून होतो. रस्त्यावर मेंढरं घेऊन एक जण चालला होता. मेंढररांनी सगळा रस्ता व्यापून टाकला होता. गाडीचा कर्कश हॉर्न वाजवून सुद्धा ती बाजूला होत नव्हती. कसा बसा कडे कडेने मी त्यातून पार झालो. आरशात पाहिलं तर तुषारची तीच परीक्षा चालू होती. त्याची वाट बघत मी हळू हळू पुढे जात राहिलो. तर पुढे पुन्हा तेच. रस्त्यावर सर्वत्र मेंढरांच राज्य होतं. एपिसोड पुन्हा रिपीट टेलीकास्ट झाला. पण या नादात, माझी तुषारवर असलेली नजर हटली. मी पुढे गेलो तरी याचा पत्ता नाही. हा गडी पुन्हा अडकला असणार, येईल थोड्या वेळात असं समजून मी पुढे जात राहिलो. पुढे आणखी एक प्राणी रस्ता अडवून आरामात चालला होता. यावेळी घोडे होते. समोरून ट्रक आलेला त्यामुळे रस्ता जाम झाला होता. तो घोड्यांचा तांडा ओलांडून मी पुढे जात राहिलो. पुन्हा त्याच समजात कि तुषार येईल थोड्या वेळात. पण कसलं काय...??? तुषारचा कुठे पत्ताच नव्हता. आरशावर नजर ठेवत मी चांगला १-२ km पुढे गेलो पण हा आलाच नाही. शेवटी मग त्याची वाट बघत एके ठिकाणी थांबलो. ५, १०, १५, २० मिनिटे झाली तरी हा गायब. मग मात्र माझा संयम संपला आणि मी गाडी मागे फिरवली. त्याला बघत बघत पुन्हा उलटा जाऊ लागलो. डोक्यात शंभर विचार चालू झाले. कुठे गेला असेल? पडला कि काय कुठे? नदीत तर पडला नसेल? अशा ढीगभर विचारांनी काहूर माजवलं डोक्यात. वाटेत एका गुराख्याला माझ्या सारखा आणखी एक प्राणी दिसला का याची चौकशी केली पण नाहीच. बाबाजी कुठे गेले होते काय माहिती? शेवटी ठरवलं. जिथे आरमासाठी थांबलो होतो तिथ पर्यंत पुन्हा जायचं आणि हळू हळू शोध घेत पुन्हा यायचं. सुसाट निघालो आधीच्या थांबलेल्या जागेकडे. तिथ पर्यंत पोहोचलो. तिथे दोन सैनिक होते त्यांच्या कडे विचारपूस करत असतानाच त्यांनी उलट्या दिशेने माझ्या मागेच बोट दाखवले आणि मला तुषार दिसला. शिव्यांचा वर्षाव करतच त्याच्याकडे गेलो. तिथे पोहोचलो आणि पुढे:

मी: कुठे तडफडला होतास बे ?
तुषार: रिवर राफ्टींग बघत रिसोर्टपाशी थांबलो होतो. तुला परत उलटं जाताना पाहिलं आणि ते सोडून तुझ्या मागे आलो.
मी: साल्या !!! इथे माझी वाट लागलेली. कुठल्या दरीत जाऊन उलथलास हे पाहायला परत आलो होतो.
तुषार: अबे!!! होर्न वाजवत तुला थांबण्याचं सांगत होतो. त्या हॉर्नचा आवाज ऐकून रस्त्यावरची लोकं पण वैतागली. पण तुझ लक्ष कुठे होतं? सुसाट उलटा चालला होतास.
मी: तू  कुठे धडपडलास ते बघायचं कि माझ्या मागे कोण हॉर्न बडवत येतोय ते बघायचं.
तुषार: फुकट ५ km मागे यायला लावलंस.
मी: आता घरी जाता जाता असले उद्योग नको. उगा डोक्याला ताप साला !!!

अजूनही बरच तोंडसुख घेतलं त्याच्यावर पण असो... आम्ही परत निघालो. सोनमर्ग मध्ये पोहोचलो होतोच. एक मस्त चहा घेऊन मग पुढे जावं यावर एकमत झालं म्हणून तिथे थांबलो. एका टपरी वर चहाची ऑर्डर दिली आणि तिथलं सौंदर्य न्याहळत बसलो शिवाय गप्पा हि चालू होत्याच. सोनमर्ग खरच मनाला भावलं. पुन्हा इथे घरच्या मंडळींना घेऊन चांगले ४-५ दिवस यायलाच पाहिजे असे वाटून गेले. आणखी थोडा वेळ तिथे गेला आणि मग आम्ही तिथून निघालो. थोडेच पुढे गेलो असू तेव्हा तुषार म्हणाला इतक्या दिवसात नदी एवढ्या जवळ असताना आपण एकदाही थांबून नदीत उतरलो नाही. हि वेळ पुन्हा येणार नाही. लगेच थांबलो. जागा बघून गाड्या बाजूला लावल्या आणि उतरलो नदीत. थोडा वेळ घालवला आणि निघालो. बाहेर पडताना मी काही गोटे आठवण म्हणून बरोबर घेतले (घरी असलेल्या फिशटँक मधे ठेवलेत). आता कुठेही थांबायचं नव्हतं. रस्ता झक्कास होता. दऱ्या डोंगर बघत, वळणावळणाच्या चकचकीत रस्त्याने वारा कापत पुढे जात रहाणे. अहाहा !!! काय सुख होतं ते. तिथून निघाल्यापासून एकाही गाडीला आम्ही ओवरटेक करू दिले नाही. श्रीनगर जवळ आलं तेव्हा थोडा वेग मंदावला. खूप दिवसांनंतर एक मस्त राईड मिळाली.









श्रीनगर मध्ये खूपच लवकर पोहोचलो. श्रीनगर मधे राहणार असाल तर नगिन लेकला रहा असा सल्ला आम्हाला लेह मध्ये भेटलेल्या राहुल ने दिला होता. तस चौकशी करत आम्ही नगिन लेकला पोहोचलो. तिथे हॉटेल असं एकही नव्हत. सगळ्या हाउसबोट्स. रेट विचारला तर १५०० सांगितलं. आयला ८-१० तास घालवायचे त्यासाठी १५०० जास्तच होते. नुसता मुक्कामच तर करायचाय. उद्या सकाळी इथून निघणार आहोत. कशाला फुकट १५०० घालवायचे? हाउसबोट मधे राहायची हौस बायको बरोबर पूर्ण करू असा विचार केला आणि तिथून निघालो. वेळ पुष्कळ होता. आता चौकशी सुरु झाली दलसरोवराची. गल्ली बोळातून मार्ग काढत काढत तिथे पोहोचलो. वाटलं जगप्रसिद्ध दल सरोवराजवळ मुक्काम करू आणि होडीने त्यात फिरू. पण नशिबात काही वेगळच लिहिलं होतं. सोनमर्गवरून आल्यामुळे त्या सरोवराजवळ आम्ही उत्तरेकडे पोहोचलो होतो. हॉटेलची विचारपूस केली तर एकही गड्याला नीट सांगता येईना. सरोवराच्या वरील अर्धगोला भोवती ४-५ वेळा फिरून झालं पण हॉटेल काही मिळेना. एका टोकाला विचारलं तर तो दुसऱ्या टोका कडे असेल म्हणून सांगायचा. ५-६ km गाडी चालवून तिकडे गेलो तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात परत उलटे जावा असं उत्तर मिळालं. पुन्हा उलटं गेलो. फिरून फिरून भोपळे चौकात अशी गत झाली. इकडचे लोक तिकडची माहिती सांगायचे आणि तिकडचे लोक इकडची माहिती सांगायचे. एकी कडून दुसरीकडे करण्यात दोन तास गेले. तिथल्या (मंद) माणसांना एकही हॉटेलचा पत्ता नीट सांगता येईना. एवढ्या मोठ्या सरोवराजवळ एकही हॉटेल नाही मिळत म्हणून दोघांचीही चिडचिड झाली होती. शेवटी ठरवलं मरू देत सरोवर. आपण हायवेलाच थांबू आणि सकाळी लगेच निघू. म्हणून मग दक्षिणेकडे मोर्चा वळवला. रत्यावर जाताना पाटी दिसली 'दल गेट'. पुढे जाऊन बघतो तर काय हॉटेलची मोठी रांगच होती. ओळीने भरपूर हॉटेल्स. अगदी पाहिजे तशी. शिवाय सरोवरामध्ये हाउसबोट्स पण ओळीने लागलेल्या.
हाउसबोट्स
आयला 'दल गेट'ला जावा असं सागायला त्यांची काय जीभ जड झाली होती कुणास ठाऊक? एक दोन हॉटेल्स बघितले आणि आम्हाला ५०० रुपड्यांमध्ये एक चांगली रूम मिळाली. जीव भांड्यात पडला. पण या सगळ्यात २-२.५ तास गेले त्यामुळे दल सरोवरात हिंडायचे राहून गेले. झटपट सगळं आवरलं आणि लेक भोवती फेरफटका मारायला निघालो. हाउसबोट्सच्या एजंट्सचा सुळसुळाट झालेला अनुभवला. कडेकडेने फिरत असताना १० जणांनी हाउसबोट्स पाहिजे का? हा प्रश्न विचारला. त्यांना नको नको म्हणताना नाकी नऊ आले. अखेर आम्ही परत माघारी फिरलो आणि एका हॉटेल मध्ये जेवायला गेलो. मस्त पंजाबी थाळी होती. कडाडून भूक लागली होती. दणकून हाणले सगळे पदार्थ आणि तृप्त होऊन तिथून बाहेर पडलो. पुन्हा दलच्या कडेने चक्कर मारत हॉटेलवर आलो. चक्कर मारताना घरच्या रिपोर्टिंगच काम उरकून घेतलं. दिवस मजेत संपला. झालेल्या प्रवासाची गोळाबेरीज करत झोपी गेलो.


क्रमश: